सेप्टीक चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला, त्या तिघांना आलेलं मरण अंगावर काटा आणणारं

| Updated on: Oct 21, 2022 | 12:37 PM

गटार साफ करताना तिघे गुदमरले! पुण्यातील वाघोली परिसरातील घटनेनं हळहळ

सेप्टीक चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला, त्या तिघांना आलेलं मरण अंगावर काटा आणणारं
कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : सेप्टीक टँक साफ करताना तिघा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातील वाघोली परिसरात (Pune chamber death) घडली. सुरुवातीला सेप्टींक टँकमध्ये (Septic Tank Death Pune) उतरलेल्या दोघा जणांचा मृतदेह हाती लागला होता. त्यानंतर तिसऱ्या कामगाराचा शोध सुरु होता. अग्निशमन दलाकडून वाघोलीतील  (Wagholi, Pune)सोसायटीत रेस्क्यू ऑपरेशन केलं जात होतं. अखेर आता तिन्ही कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. सेप्टींग टँकमध्ये गुदरल्यानं कामगारांचा श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका घेतली जाते आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर फायर ब्रिगेडला तातडीने पाचारण करण्यात आलं. फायर ब्रिगेडच्या जवानांनाकडून या कामगारांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोघा कामगारांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दरम्यान, तिसऱ्या कामगाराचा शोध बराच वेळ सुरु होता. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर तिसरा मृतदेहही फायर ब्रिगेडच्या हाती लागला. तिन्ही मृतदेहांची ओळख पटली असली या घटनेनं सगळेच हादरुन गेले आहेत.

हे सुद्धा वाचा

मृत कामगारांची नावं :

  • नितीन गौड, वय 45
  • गणेश भालेराव, वय 38
  • सतिशकुमार चौधरी, वय 35

फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार शुक्रवारी सोसायटीतील गटार साफ करण्यासाठी आले होते. शुक्रवारी सकाळी हे सगळे साफ करण्यासाठी गटारात उतरले. मात्र गटारातील विषारी वायूमुळे तिन्ही कामगारांचा श्वास कोंडला गेला. त्यांना प्राणवायू मिळू न शकल्यानं तीनही कामगार गुदमरले. दोघे जण आत अडकल्याचं कळल्यानंतर तिसरा व्यक्तीही त्यांच्या मदतीसाठी गेला आणि त्याच्यावरही काळानं घाला घातला, असं सांगितलं जातंय.

अंगावर काटा आणणार थरारक प्रसंग घडला. दुर्दैवाची बाब म्हणजे मदत मिळण्याआधीच मृत्यूने तिन्ही कामगारांना गाठलं होतं. सुरक्षेची काळजी गटारात उतरण्याआधी घेतली गेली होती का? ही दुर्घटना नेमकी कुणाच्या बेजबाबदारपणामुळे घडली? असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

वाघोली पोलिसांना या घटनेबाबत कळवण्यात आलं असून याचा अधिक तपास केला जातो आहे. तीन कामगारांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याआधीही अनेकदा सेप्टीक टँकमध्ये सफाई करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे गुदमरुन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र त्यानंतरही सुरक्षेला गांभीर्याने का घेतलं जात नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय.