साताऱ्यासह महाराष्ट्राला पुन्हा डॉ. डेथची का आठवण? नेमकं काय केलं होतं डॉ. संतोष पोळनं?

| Updated on: Aug 12, 2021 | 8:48 PM

सातारा जिल्हा एका दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. वाई तालुक्यातील व्याजवाडी परिसरात नितीन गोळे या आरोपीने आपली पत्नी आणि प्रेयसी अशा दोघींचाही खून केला आहे.

साताऱ्यासह महाराष्ट्राला पुन्हा डॉ. डेथची का आठवण? नेमकं काय केलं होतं डॉ. संतोष पोळनं?
साताऱ्यासह महाराष्ट्राला पुन्हा डॉ. डेथची का आठवण? नेमकं काय केलं होतं डॉ. संतोष पोळनं?
Follow us on

सातारा : सातारा जिल्हा एका दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. वाई तालुक्यातील व्याजवाडी परिसरात नितीन गोळे या आरोपीने आपली पत्नी आणि प्रेयसी अशा दोघींचाही खून केला आहे. आरोपी नितीन गोळेने 3 ऑगस्टला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करुन तिचा मृतदेह शेतात लपावला होता. पण भुईंज पोलिसांनी केलेल्या तपासात गोळेचं बिंग फुटलं. विशेष म्हणजे आरोपी नितीन गोळे याने 2019 मध्ये पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. या दोन हत्येच्या घटना उघड झाल्यानंतर आता साताऱ्यातील नागरिकांना पुन्हा डॉ. डेथची आठवण झाली आहे. कारण ज्याप्रमाणे सीरियल किलर डॉ. डेथ याने हत्या करुन मृतदेह जमिनीत गाडले होते अगदी तशीच पद्धत नितीन गोळे याने आपला गुन्हा लपविण्यासाठी वापरली आहे. या गोळेने आणखी कुणाची हत्या केलीय का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

गोळेने प्रेयसीचा मृतदेह शेतात आणि पत्नीचा मृतदेह ओढ्यात पुरला

आरोपी नितीन गोळेने 3 ऑगस्टला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करुन तिचा मृतदेह शेतात लपावला होता. या प्रकारणाचा भुईंज पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व प्रकरण उजेडात आले. भुईंज पोलिसांनी आरोपी नितीनला कर्नाटकमधून ताब्यात घेतले. तसेच त्याची सखोल चौकशी केली. त्यानंतर पोलीस तपासात 2019 मध्ये नितीन गोळेने पत्नी मनीषा गोळे हीचादेखील खून केल्याचे समोर आले. आरोपी नितीनने पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला होता. त्याचे हे सगळे कृत्य वाई तालुक्यातील डॉ. डेथ सारखी असल्याची चर्चा आता साताऱ्यात होऊ लागली आहे.

डॉ. डेथ नेमका कोण?

सातारा पोलिसांनी वाई तालुक्यात सीरियल किलर असलेला कथित डॉक्टर संतोष पोळ याच्या 2016 मध्ये मुसक्या आवळल्या होत्या. त्यच्यावर पाच महिला आणि एका पुरुषाच्या हत्यांचा आरोप आहे. मात्र याशिवाय गावातील अनेक जणांच्या बेपत्ता होण्यामागे पोळचा हात असल्याचं बोललं जातं. तब्बल 13 वर्ष साताऱ्यातील वाई-धोम गावात त्याचे काळे धंदे सुरु होते. ऑगस्ट 2016 मध्ये त्याला मुंबईतील दादर भागातून अटक झाली आणि त्याच्या पापांचा घडा भरला. लुटीच्या उद्देशानेच संतोष पोळने हत्या केल्याचा आरोप आहे. मीडियाने संतोष पोळला ‘डॉक्टर डेथ’ असे नाव दिले. पोळला साथ देणारी परिचारिका ज्योती मांद्रे माफीची साक्षीदार झाली. पोळ तुरुंगात असून त्याच्यावर खटला सुरु आहे. संतोष पोळने आपल्यासमोर तीन खून केले, तर आधीच तीन खून केले होते, अशी जबानी तिने न्यायालयात दिली होती.

संतोष पोळचा पर्दाफाश कसा झाला?

सातार्‍यातील वाईमध्ये राहणाऱ्या 49 वर्षीय अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे अचानक बेपत्ता झाल्या. शोधाशोध करुनही त्या कुठेच सापडल्या नाहीत. अखेरीस जेधे कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. गावातील डॉ. संतोष पोळ याचा मंगला जेधेंच्या बेपत्ता होण्यामागे हात असावा, अशी शंका त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे व्यक्त केली होती.

मंगला जेधे बेपत्ता प्रकरण

खरं तर संतोष पोळ हा भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ता म्हणून काम करत होता. मंगला जेधे यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याच्या प्रभारींविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा उघडकीस आणला होता. त्यामुळे पोलीस डॉ. पोळची चौकशी करण्यास चालढकल करत होते. पण दबाव वाढत गेला आणि पोलिसांनी पोळला चौकशीसाठी ठाण्यात बोलवावं लागलं. चौकशीदरम्यान संतोष पोळने साहजिकच मंगला जेधे बेपत्ता होण्यामागे आपला हात नसल्याचं सांगितलं. उलट मंगला जेधे यांनी आपली 233.3 ग्रॅमची (20 तोळे) सोन्याची चेन दुप्पट करुन देण्याच्या वाद्याने फसवणूक केल्याची तक्रार दिली. पोळविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्याला सोडून दिलं गेलं.

मंगला जेधेंचा मोबाईल ज्योतीकडे सापडला

पोलिसांनी मंगला जेधेच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली. तेव्हा तिचा मोबाइल ज्योती मांद्रे नावाच्या नर्सकडे असल्याचं समोर आलं. ज्योती ही संतोष पोळकडे काम करत होती. यानंतर पोलिसांनी ज्योतीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलं. चौकशीदरम्यान ज्योतीने तोंड उघडलं आणि संतोष पोळनेच मंगला जेधेंची हत्या करुन फार्महाऊसमध्ये पुरल्याचं सांगितलं. ज्योती आपल्या कुकर्मांचा पाढा वाचणार, याची भीती असल्याने पोळने आधीच मुंबईला पोबारा केला होता.

फार्महाऊसजवळ पाच सांगाडे सापडले

ज्योतीने सांगितल्यानुसार पोलिसांनी संतोष पोळच्या फार्महाऊसमध्ये खोदकाम केले. तिथे असलेले नारळाचे झाड जेसीबीच्या मदतीने काढले गेले. तिथे जमिनीखाली एक सांगाडा सापडला. हा सांगाडा मंगला जेधे यांचा असल्याचे फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले. मंगला जेधे पुण्याला लेकीकडे जाण्यास निघाल्या असताना ज्योती आणि संतोषने 15 जून 2016 रोजी वाई बस स्टॉपवरुन त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या केली.

2003 मध्ये पहिली हत्या

संतोष पोळने 2003 मध्ये पहिली हत्या केली. पोळ आपल्या फार्महाऊसवर रुग्णांना उपचाराच्या बहाण्याने बोलवायचा. त्यांना इंजेक्शन देऊन शरीरकार्य थांबवायचा. म्हणजेच ती व्यक्ती त्यावेळी जिवंत असायची. त्यानंतर फार्महाऊसमध्ये आधीच खोदून ठेवलेल्या खड्ड्यात त्यांना जिवंत पुरायचा. त्यावर अण्णा नाईकांप्रमाणे कलम म्हणजेच झाड लावायचा. नारळाच्या झाडाखाली पाच सांगाडे सापडले. ते सर्व महिलांचे होते, तर तलावात फेकलेला एका पुरुषाचा मृतदेह सापडला नाही. (Zee Marathi Dev Manus TV Serial based on Doctor Death Santosh Pol Wai Dhom Murder Case)

ज्योतीची साक्ष

“वाईमध्ये डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात असताना 2013 मध्ये आपली संतोष पोळशी ओळख झाली. 13 ऑक्‍टोबर 2013 रोजी आम्ही दोघांनी वाईतील गायत्री मंदिरात लग्न केलं. तीन वर्षांनी माझं नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण झालं. लेखी परीक्षा झाली, पण तोंडी परीक्षेपूर्वी मला मंगल जेधे, सलमा शेख आणि नथमल भंडारी यांच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. मार्च 2015 मध्ये डॉ. घोटवडेकरांनी कामावरुन काढून टाकल्याने मला पैशाची चणचण भासू लागली. त्यांनी संतोष पोळला भाड्यावर रुग्णवाहिका चालवायला दिली होती; परंतु हप्ते न भरल्याने त्यांनी ती परत घेतली.” अशी साक्ष ज्योती मांढरेने जानेवारी 2020 मध्ये दिली होती.

2015 मध्ये संतोष पोळच्या खोट्या डिग्रीचं समजलं

नोव्हेंबर 2015 मध्ये मी संतोषला प्रॅक्‍टिस सुरु करण्यास सांगितलं. तेव्हा त्याने त्याची डिग्री खोटी आहे, रजिस्ट्रेशन झाले नाही, असं सांगितलं. लोक मला डॉक्‍टर समजतात. मी तपासणीच्या बहाण्याने त्यांना बोलवतो. आपण त्यांना मारुन दागिने लुटू, असा प्लॅन त्याने सांगितला. मी पकडलं जाण्याची भीती व्यक्त केली. तेव्हा सुरेखा चिकणे (20 मे 2003), वनिता गायकवाड (ऑगस्ट 2006) आणि जगाबाई पोळ (13 ऑगस्ट 2010) यांची आधी हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याची जबानी ज्योतीने दिली. या प्रकरणाचा निकाल अद्याप बाकी आहे.

‘देवमाणूस’ मालिका याच घटनेसारखी

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ (Dev Manus TV Serial) ही मालिका लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत डॉ. अजितकुमार देव या व्यक्तिरेखेने साताऱ्यातील छोट्याशा खेडेगावात अनेक भोळ्याभाबड्या व्यक्तींना फसवल्याचे दाखवले आहे. रेश्मा, अपर्णा, मंजुळा अशा अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘कम्पाऊण्डर’ असलेला देवीसिंह उर्फ अजित त्यांची हत्या करतो. त्याच्या कारस्थानांमध्ये डिम्पल त्याला साथ देते. हे कथानक छोट्या पडद्यावर पाहतानाही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उमटतात, त्यामुळे अशा घटना साताऱ्यात प्रत्यक्षात घडल्याचं ऐकून तुमच्या जीवाचा अक्षरशः थरकाप उडेल. वाई-धोम या बहुचर्चित हत्याकांडाशी साधर्म्य असलेले (झी मराठीकडून तसा कोणताही दावा केलेला नाही) ‘देवमाणूस’ मालिकेचे कथानक आहे.

हेही वाचा :

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पकडलं, आरोपी म्हणाला, बायकोलाही 2 वर्षापूर्वी पुरलंय!