नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले, एकाला वाचवण्यात यश, दोघांचा पत्ताच नाही

| Updated on: Aug 31, 2021 | 12:53 AM

सेल्फीचा नाद किती महागात पडू शकतं ते अनेकदा समोर आलं आहे. मात्र, आजचे तरुण अशा घटनांमधून खरंच काही बोध घेताना दिसत नाहीत. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात तीन तरुणांना या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे.

नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले, एकाला वाचवण्यात यश, दोघांचा पत्ताच नाही
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

जयपूर : सेल्फीचा नाद किती महागात पडू शकतं ते अनेकदा समोर आलं आहे. मात्र, आजचे तरुण अशा घटनांमधून खरंच काही बोध घेताना दिसत नाहीत. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात तीन तरुणांना या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे. सेल्फी काढण्यासाठी ते नदीपात्रात गेले. यावेळी एका तरुणाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. ते देखील नदीपात्रात पडले. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले. त्यांनी आरडाओरड केला. यावेळी किनाऱ्यावर असणाऱ्या काही गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी फक्त एका तरुणाला वाचवू शकले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने इतर दोन तरुणांचा तपासच लागला नाही.

नेमकं काय घडलं?

नदी किनाऱ्यावर सोमवारी तीन मित्र गेली होती. दिव्यांशू (वय 21), विकास (वय 17), गुलशन (वय 16) अशी या मित्रांची नावे आहेत. या तीनही मित्रांना नदी किनारी सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ते सेल्फी काढण्यात गर्क झाले. यावेळी एका तरुणाता पाय सटकला आणि तो थेट नदीत पडला. यावेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्याचे इतर दोन्ही मित्रही नदीत पडले. यावेळी ते तीनही मित्र वाहून जात होते. त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतली. गावकऱ्यांना दिव्यांशूला वाचवण्यात यश आलं. पण इतर दोघांचा पत्ता लागला नाही. कारण नदीतील पाण्याचा प्रवाहच तितका जास्त होता.

दोन्ही मुलांचा शोध सुरु

अखेर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. पण दोन्ही मित्रांचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन पथकाचे जवान त्यांचा नदीत अद्यापही शोध घेत आहेत. तसेत गावकरी देखील त्यांच्या धरतीवर मेहनत घेत आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच वाहून गेलेल्या मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळ येऊन आक्रोश केला. यावेळी इतर गावकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं. सध्या प्रशासन दोन्ही मित्रांचा शोध घेत आहेत.

बुलडाण्यात नदीपात्रात सेल्फीसाठी गेलेला तरुण बुडाला

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एका तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली. या घटनेनंतर काही तासांनी 24 वर्षीय अनिल सरोकार या तरुणाचा तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात मृतदेह आढळला. या घटनेमुळे खांडवी गावात शोकाकूळ वातावरण होतं. घरातील तरुणाचं निधन झाल्याने कुटुंबीयांनी टाहो फोडत आक्रोश केला होता.

पालघरमध्येही तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात एका 17 वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सफाळे जवळील रोडखड पाडा धरणात युवकाचा मृत्यू झाला. तन्मेष विकास तरे असं पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील एडवन येथील रहिवाशी होता. तन्मेष तरे हा काही मुला-मुलींसोबत फिरायला गेला होता. त्याच्यासोबत मुला-मुलींचा मोठा ग्रुप होता. यावेळी रोडखड धरणाजवळ आल्यानंतर हा ग्रुप मस्ती करत होता. यातच काही जण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. तन्मेष तरे हासुद्धा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

यावेळी धरणात पोहत असताना त्याला पाण्याच अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडायला लागला. ही घटना घडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. तन्मेषच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर धरणाजवळ काही लोकांनी धाव घेतली. या लोकांनी तन्मेषला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पाण्यात बुडून तन्मेषचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

तिने प्रियकराला घाबरुन घरात सीसीटीव्ही लावले, अवघ्या एक तासात कॅमेऱ्यात भयानक थरार कैद

श्रीमंतीचा माज, दारु पिऊन अलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, परळीतील बड्या नेत्याच्या मुलाचं संतापजनक कृत्य