आईचे विवाहबाह्य संबंध, दोन मुलींचीही लफडी, प्रियकरांच्या साथीने तिघींनी घरादाराला पाजलं विष

| Updated on: May 19, 2022 | 10:28 AM

आई आणि दोन्ही मुलींची प्रेम प्रकरणं सुरु होती. मात्र घरातील इतर सदस्यांचा त्यांना विरोध होता. कुटुंबीयांनी त्यांना भेटायलाही बंदी घातली होती. फोनवरही त्यांना आपापल्या प्रियकरांशी बोलता येत नव्हते. यानंतर तिघींनी मिळून कुटुंबीयांना जीवे मारण्याचा कट रचला

आईचे विवाहबाह्य संबंध, दोन मुलींचीही लफडी, प्रियकरांच्या साथीने तिघींनी घरादाराला पाजलं विष
पाच जणांना अटक
Image Credit source: आज तक
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधून (Uttar Pradesh Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सुनेने आपल्या मुलींच्या साथीने सासू, सासरे, पती आणि दोन दिरांच्या जेवणात विष मिसळले. विषाचा डोस कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसला, तरी सर्व सदस्यांची शुद्ध हरपताच आई आणि मुली आपापल्या प्रियकरांसह (Boyfriends) पळून गेल्या. घरात काही हालचाल जाणवत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी फरार महिला आणि तिच्या मुलींना त्यांच्या प्रियकरांसह अटक (Attempt to Murder) केली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि दोन्ही मुलींची प्रेम प्रकरणं सुरु होती. मात्र घरातील इतर सदस्यांचा त्यांना विरोध होता. कुटुंबीयांनी त्यांना भेटायलाही बंदी घातली होती. फोनवरही त्यांना आपापल्या प्रियकरांशी बोलता येत नव्हते. यानंतर तिघींनी मिळून कुटुंबीयांना जीवे मारण्याचा कट रचला. मात्र अन्नात विष मिसळताना लेकीचे काळीज तीळतीळ तुटले. तिने जेवणात अत्यंत सौम्य प्रमाणात विष कालवले. कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होऊ नये, अशी मुलीची इच्छा होती. मात्र विषबाधेमुळे वृद्ध महिलेची प्रकृती अजूनही गंभीर आहे, तिच्यावर ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांची तिन्ही मुले उपचारानंतर घरी परतली आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

मुलींची आई राजकुमारी हिचे गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते, ज्याची कुटुंबातील सर्व सदस्यांना माहिती होती. यावरून घरात नेहमी वाद होत असत. यानंतर महिला घरातून निघून गेली होती. ती काही दिवसांनी परतली. यादरम्यान तिच्या दोन्ही मुलींचेही गावातील दोन मुलांशी प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब महिलेला समजल्यानंतर तिने कधीही विरोध केला नाही. दुसरीकडे राजकुमारी तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती.

एके दिवशी राजकुमारी तिचा प्रियकर रवींद्रशी फोनवर बोलत असताना पती देवेंद्रने ऐकलं. देवेंद्रने पत्नी आणि तिच्या प्रियकराला न बोलण्याची धमकी दिली. यानंतर पत्नीचा फोन तोडला. त्यामुळे राजकुमारीने आपल्या दोन मुलींच्या मदतीने कुटुंबातील सर्व सदस्यांचा काटा काढण्याची योजना आखली.

आणि कट शिजला

या योजनेत दोन्ही मुलींचे प्रियकर अभिषेक आणि दीपक यांची मुख्य भूमिका होती. सर्वांनी मिळून संपूर्ण कुटुंबाला विष पाजून ठार मारण्याची योजना आखली. काही दिवसांनी परत येऊ, त्यामुळे संपूर्ण मालमत्तेचा ताबाही मिळेल, असा त्यांचा डाव होता. नियोजनानंतर दुसऱ्या दिवशी प्रियकर दीपक आणि अभिषेक यांनी विष आणले.

सौम्य विषामुळे कुटुंबीय बेशुद्ध

पोलिसांनी सांगितले की, विषमिश्रित जेवण मुलगी अर्चना सर्वांना देणार, असं ठरलं होते. मात्र जेवण वाढताना तिचं हृदय हेलावलं. यामुळे सगळ्यांचा जीव जाऊ शकतो असा विचार करताच ती थरथर कापायला लागली. यानंतर विषाचा डोस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेवल्यानंतर काही वेळातच, म्हणजे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरातील सदस्यांची प्रकृती खालावली आणि ते सर्व जण बेशुद्ध पडले. यानंतर महिला आपल्या मुलींच्या प्रियकरांसह फरार झाली.

घरात काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. घरी जाऊन पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. सर्व जण बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सर्वांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेचा प्रियकर कटात सहभागी नाही

या घटनेत राजकुमारीचा प्रियकर रवींद्रचा सहभाग नसून केवळ मुलींच्या प्रियकराची भूमिका असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेचे तिच्या प्रियकराशी भांडण झाले होते, त्यामुळे तिने हे प्रियकराला सांगितले नव्हते.

पोलिसांनी पाचही जणांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. विषारी अन्न प्राशन करणाऱ्या चौघांची प्रकृती ठीक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेची उकल करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. ग्रेटर नोएडातील बनारसी पुलिया येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महिला, तिच्या दोन मुली आणि त्यांच्या दोन प्रियकरांचा समावेश आहे.