मुलीसह बाजारात चालली होती महिला, अचानक भररस्त्यात एकच किंकाळी उडाली, काय घडले नेमके?

त्या दोघी मायलेकी बाजारात चालल्या होत्या. यावेळी अचानक भररस्त्यात किंकाळ्या ऐकू आल्या अन् सर्वच हैराण झाले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर जे घडले ते भयंकर होते.

मुलीसह बाजारात चालली होती महिला, अचानक भररस्त्यात एकच किंकाळी उडाली, काय घडले नेमके?
Image Credit source: tv9
| Updated on: May 05, 2023 | 9:40 PM

लखनौ : आपल्या दहा वर्षाच्या मुलीसह बाजारात चाललेल्या महिलेची अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला करत भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यूपीच्या प्रतापगडपासून 60 किमी अंतरावर असलेल्या संग्रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. भरदिवसा बाजारात झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली. ही महिला आपल्या मुलीसह बाजारात जात होती. तेवढ्यात मागून काही हल्लेखोर आले आणि त्यांनी हिरागंज कालव्याजवळ महिलेवर चाकूने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. यावेळी महिलेच्या मुलीने तेथून पळ काढत आपला जीव वाचवला. मालती असे मयत महिलेचे नाव आहे.

बाजारात जात असताना हल्ला

नूरपूर येथील रहिवासी असलेली 45 वर्षीय मालती आपल्या 10 वर्षाच्या मुलीला घेऊन बाबागंज मार्केटला जात होती. ती हिरागंज कालव्याजवळ पोहचताच मोटरसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तिच्यावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. मालतीच्या मुलीने हिम्मत करुन तिथून पळ काढला आणि तिचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मालतीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, मालतीची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मालतीच्या मुलीची पोलीस चौकशी करत आहेत. मालतीच्या पतीचे तीन वर्षापूर्वी निधन झाले आहे. पोलीस घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजही शोधत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने हत्येबाबत काही सुगावा लागण्याची शक्यता आहे.

संपत्तीसाठी हत्या झाल्याचा संशय

मालतीची हत्या संपत्तीसाठी झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या बाजूनेही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पतीच्या निधनानंतर मालती त्याच्या संपत्तीची मालकीण होती. तपासाअंतीच हत्येचे रहस्य उलगडेल.