CBSE Board Exam: बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा, कधीपासून लागू होणार नियम?

CBSE Board Exam: विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी, त्यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन परीक्षांमधील सर्वोत्तम गुण कायम ठेवण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

CBSE Board Exam: बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा, कधीपासून लागू होणार नियम?
Board Exam
| Updated on: Feb 19, 2025 | 10:15 AM

CBSE Board Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डात (CBSE) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. सीबीएसई बोर्डाने त्यांच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. तसेच सीबीएसई जागतिक अभ्यासक्रमही सुरू करणार आहे. त्याचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल. त्यावर लोकांकडून सूचना मागवल्या जातील.

सर्वोत्तम गुण ग्राह्य धरणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2026-27 या शैक्षणिक सत्रापासून परदेशी विद्यार्थ्यांसाठी जागतिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उच्चस्तरीय बैठकीत सीबीएसई ग्लोबल स्कूलचे अधिकारी उपस्थित होते. त्यावर नवीन अभ्यासक्रम तयार करण्याबाबत चर्चा केली.

विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी, त्यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन परीक्षांमधील सर्वोत्तम गुण कायम ठेवण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले…

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोर्डाची परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्याचा मसुदा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण देण्यावर आमचा भर असल्याचे प्रधान यांनी म्हटले होते. त्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करणे हे महत्वाचे पाऊल आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले, शालेय शिक्षण सचिव, सीबीएसई बोर्डाचे अध्यक्ष, मंत्रालयातील अधिकारी आणि सीबीएसईचे अन्य अधिकाऱ्यांसोबत वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. आता त्यासंदर्भातील मसुदा तयार होत असून तो जनतेपुढे सादर करण्यात येणार आहे.

सीबीएसई 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या परीक्षा 4 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने परीक्षेतील पेपर फुटीसंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या अफवांबाबत एक नोटीस जारी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब, फेसबुक, एक्स आणि इतर ठिकाणी पसरवण्यात येणाऱ्या अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Follow Us