पोरांनो दफ्तर सोडा आणि खेळायला चला, राज्य शासनाचा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रम
महाराष्ट्र शासन पहिली आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा उपक्रम राबवणार आहे. 'हॅपी सॅटर्डे' असं या उपक्रमाचं नाव आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात मोठा फायदा होणार आहे.
![पोरांनो दफ्तर सोडा आणि खेळायला चला, राज्य शासनाचा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम पोरांनो दफ्तर सोडा आणि खेळायला चला, राज्य शासनाचा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/schoolb-students.jpg?w=1280)
शाळा ही माणसाला घडवते. चांगल्या आणि वाईट गोष्टींची पारख करायला शिकवते. आयुष्यभर पुरतील अशा चांगल्या सवयी लावते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासा व्यतिरिक्त व्यक्तीमत्व विकासाला महत्त्व देते. विद्यार्थ्यांचे कलागुण आणि रूची ओळखून क्रीडा, कला, चित्रकला सारख्या विविध विषयांबाबत शिक्षण देते. शाळेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. सध्याच्या काळात मोबाईलमुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली आहे. विद्यार्थी आजकाल मैदानी खेळ खेळण्यापेक्षा फक्त मोबाईल किंवा कम्प्युटरवर गेम खेळणं जास्त पसंत करतात. यामुळे मुलांच्या डोळ्यांना त्रास होतोच, यासोबत मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावरही त्याचा परिणाम पडतो. या सर्व गोष्टींचा विचार करता राज्य शासन पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय नाविण्यपूर्ण असा उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासन नवा उपक्रम आणणार आहे. ‘हॅपी सॅटर्डे’ असं या उपक्रमाचं नाव आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा होणार आहे. पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हॅपी सॅटर्डे हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारच्या दिवशी मुलांनी वही, पुस्तक, दप्तर शाळेत आणायचे नाही.
या दिवशी विद्यार्थ्यांना शेती, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार, मैदानात घेऊन जाण्यात येईल. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम आहे. सध्या विद्यार्थी आणि तरुण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत मैदानाकडे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.