अभिजीत बिचुकले यांना किती मते मिळाली? बारामतीत दणकून पराभव झाल्यानंतर कवी मनाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?

बारामती पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना ऐतिहासिक विजय प्राप्त झाला आहे. तर अभिजीत बिचुकले यांना मोजकीच मते मिळाली आहेत. आता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत बिचुकले यांना किती मते मिळाली? बारामतीत दणकून पराभव झाल्यानंतर कवी मनाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
Abhijit bichukale
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2026 | 4:44 PM

बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे चर्चेत राहिलेले ‘कवी मनाचे’ नेते अभिजीत बिचुकले यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, पराभवानंतरही बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक विधाने केली आहेत.

सुनेत्रा पवारांच्या विजयात माझाही वाटा!

बारामतीत सुनेत्रा पवार यांनी २ लाखांहून अधिक मताधिक्य घेत अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला आहे. यावर भाष्य करताना बिचुकले म्हणाले की, “हा कसला रेकॉर्ड? त्यांना विरोधकांची पण मते मिळाली आहेत आणि त्यांच्या या विजयात माझाही वाटा आहे.” बिचुकले यांनी असा सवाल उपस्थित केला की, जर मतदारसंघात सहानुभूतीची लाट होती, तर मग एवढा प्रचार करण्याची गरज काय होती?

‘आमदार व्हायला १०० कोटी लागतात’

निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढताना बिचुकले यांनी खळबळजनक दावा केला. “आजच्या काळात आमदार व्हायचे असेल तर खिशात १०० कोटी रुपये लागतात. काही लोकांना गुलामगिरीची सवय लागली आहे,” असे म्हणत त्यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर टीका केली. तसेच, “मी माझा अर्ज मागे घेतला नाही, कारण लोक म्हणाले असते की याने काहीतरी घेतले आहे. माझे डिपॉझिट जप्त झाले असले तरी ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत, मी कोणाकडून आणलेले नाहीत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

२०० मतांची किंमत मोठी

अभिजीत बिचुकले यांना या निवडणुकीत फारशी मते मिळवता आली नाहीत, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. “एका मतालाही किंमत असते. मला ज्या २०० लोकांनी मतदान केले आहे, त्या मतांची मला किंमत आहे,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षाशिवाय राज्याचा पुढचा मुख्यमंत्री होणार नाही, असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला.

बारामतीच्या रिंगणात ५५ अर्ज कसे काय आले? असा सवाल विचारत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पराभव झाला असला तरी बिचुकले यांच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Follow Us