काँग्रेस नेते संघ-भाजपशीही हातमिळवणी करू शकतात; राष्ट्रवादीच्या चाकोंचा दावा

| Updated on: Mar 20, 2021 | 8:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार पी. सी. चाको यांनी काँग्रेसवरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. (Congress Leaders Have No Hesitation In Joining Hands With RSS-BJP)

काँग्रेस नेते संघ-भाजपशीही हातमिळवणी करू शकतात; राष्ट्रवादीच्या चाकोंचा दावा
P C Chacko
Follow us on

तिरुवनंतपूरम: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार पी. सी. चाको यांनी काँग्रेसवरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. केरळ काँग्रेसमध्ये काहीही होऊ शकतं. केरळचे काँग्रेस नेते भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, अशी टीका पी. सी. चाको यांनी केली आहे. (Congress Leaders Have No Hesitation In Joining Hands With RSS-BJP)

पी. सी. चाको यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. केरळमध्ये काँग्रेस अंतर्गत कलहाने पछाडलेली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या विरोधात धर्मदाममध्ये दुबळा उमेदवार दिला. हा उमेदवार देण्यासाठीही बराच वेळ घेतला. यावरून भाजपचे उमेदवार सी. के. पद्मनाभन यांना काँग्रेसची मते मिळणार आहेत. लोकांना वाटतं काँग्रेसने शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार दिला आहे. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. माजी मुख्यमंत्री ओमेन चांडी यांचीही सर्व खेळी आहे. काँग्रसचे केरळमधील नेते मग ते ओमेन चांडी असोत की रमेश चेन्निथला… हे काँग्रेस नेते केरळात भाजप आणि संघाशी गुप्त करणार करण्यात कोणतेही आढेवेढे घेणार नाहीत, असं चाको म्हणाले.

पवारांच्या नेतृत्वात काम करत राहणार

राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ काढल्यानंतर पुन्हा राज्यात सक्रिय होणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राज्यात बराच काळ सक्रिय राहिल्यानंतर मी 1991मध्ये खासदार झाल्यानंतर दिल्लीत गेलो. तेव्हापासून मी राष्ट्रीय राजकारणाचा एक भाग राहिलो आहे. आता शरद पवार यांच्या नेतृत्वात आपला राजकीय प्रवास सुरू ठेवणार आहे, असं ते म्हणाले.

राहुल गांधींनी ऐकलं नाही

काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाने माझ्याशी काहीच संपर्क केला नाही. मलाही हायकमांड सोबत कोणतीही बार्गेनिंग करायची नव्हती. पक्ष सोडण्यापूर्वी मी तिरुवनंतपूरम विमानतळावर राहुल गांधींशी चर्चा केली होती. केरळमधील वरिष्ठ नेते अनेक प्रकरणे व्यवस्थित हाताळत नसल्याचं मी त्यांच्या कानावर टाकलं होतं. मी त्यांना वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची विनंतीही केली होती. पण राहुल गांधींनी ओमेन चांडींवर डोळेबंद करून विश्वास ठेवणं पसंत केलं. उमेदवारांच्या निवडीत झालेल्या घोळाबाबत ते व्ही. एम. सुधीरन यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. यात हायकमांडचा कोणताच हस्तक्षेप नव्हता आणि माझ्याकडे पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, असं त्यांनी सांगितलं.

ट्विट चांगले, पण…

तुम्ही हायकमांडवर नाराज होता का? असा सवाल चाको यांना करण्यात आला. तेव्हा, राष्ट्रीय स्तरावर सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाने भूमिका निभावली नाही. त्याबद्दल मी दु:खी होतो. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आपसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव राहुल गांधींकडे गेला होता. ते त्या प्रस्तावावर उत्सुक नव्हते. माझ्याकडे गोवा, पंजाब आणि हरियाणाचाही एक प्रस्ताव होता. त्यामुळे काँग्रेसला किमान 15 जागा मिळाल्या असत्या. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी उत्सुक नव्हते, असं सांगतानाच राहुल गांधी यांचे ट्विट चांगले आहेत. पण एक व्यक्ती पार्टी वाचवू शकत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. (Congress Leaders Have No Hesitation In Joining Hands With RSS-BJP)

 

संबंधित बातम्या:

पाच किलो मोफत तांदूळ देणार, पाच लाख घरे बांधणार; काँग्रेस आघाडीचा ‘पिपल्स मेनिफेस्टो’ जारी

मोफत वीज, 5 लाख रोजगार, महिलांना 2 हजार रुपये; आसाममध्ये राहुल गांधींचा आश्वासनांचा पाऊस

केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं

(Congress Leaders Have No Hesitation In Joining Hands With RSS-BJP)