ओवेसींची एमआयएम भाजपची ‘बी’ टीम सिद्ध होतेय का, यूपीतल्या ह्या जागांवरचे निकाल तरी बघा…!

| Updated on: Mar 13, 2022 | 4:04 PM

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांपैकी 100 जागांवर 'एमआयएम'चे उमेदवार उभे होते. यातली काही हिंदू अपवाद वगळता बहुतांश जण मुस्लीम होते. या पक्षाला एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत, तर अजमगढ आणि मुबारकपूर जागा वगळता इतर सर्व ठिकाणी 'एमआयएम' उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. मात्र...

ओवेसींची एमआयएम भाजपची बी टीम सिद्ध होतेय का, यूपीतल्या ह्या जागांवरचे निकाल तरी बघा...!
उत्तर प्रदेशात एमआयएमने समाजादी पक्षाची मते खाऊन भाजपला एकप्रकारे सहकार्यच केले.
Follow us on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाची बिहारसारखी जादू चालली नाही. मात्र, त्यांनी अर्धा डझन पेक्षा जास्त जागांवर समाजवादी पक्षाच्या (SP) उमेदवारांच्या विजयात विघ्न आणले. अनेक ठिकाणी मुस्लीम मतदारांची पहिली पसंदी समाजवादी पक्ष होता. मात्र, ‘एमआयएम’ उमदेवारांनी अनेक जागी इतकी मते मिळवली की, त्यामुळे भाजप (BJP) उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळेच ‘एमआयएम’ मते खाणारा पक्ष आणि भाजपची ‘बी’ टीम म्हणून उपयोगी पडत आहे का, असा प्रश्न अनेक राजकीय धुरीणांना पडलाय. या ठिकाणी ‘एमआयएम’चे उमेदवार नसते, तर समाजवादी पक्षाची जागा नक्की लागली असती. आता येणाऱ्या निवडणुकांमध्येही हीच परिस्थिती राहणार का, खरेच मस्लीम उमेदवार ‘एमआयएम’कडे असेच झुकणार का, हे पाहावे लागेल.

यूपीत 100 जागी नडले

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांपैकी 100 जागांवर ‘एमआयएम’चे उमेदवार उभे होते. यातली काही हिंदू अपवाद वगळता बहुतांश जण मुस्लीम होते. या पक्षाला एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत, तर अजमगढ आणि मुबारकपूर जागा वगळता इतर सर्व ठिकाणी ‘एमआयएम’ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. मात्र, भाजप आणि समाजवादी पक्षाच्या लढाईत त्यांनी सपचे मतदार खाण्याचे काम मात्र केले. त्यामुळे भाजपच्या अनेक उमेदवारांचा विजयपथ सोपा झाला. त्यात बिजनौर, नकुड, फिरोजाबाद, मुरादाबाद, कुर्सी, जौनपूर सारख्या मुस्लीम बहुल भागातही भाजपचे उमेदवार निवडून आले. सोबतच काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या मुस्लीम उमेदवारांनीही समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाची हवा गुल केली.

बिजनौर

बिजनौर विधानसभा मतदार संघ मुस्लीम बहुल आहे. या ठिकाणी भाजपचे मौसम चौधरी विजयी झाले. त्यांना 97165 मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे नीरज चौधरी यांना 95720 मते मिळाली. या ठिकाणी ‘एमआयएम’चे मुनीर अहमद यांनी 2290 मते मिळवली. येथे समाजवादी पक्षाचा उमेदवार 1445 मतांनी पराभूत झाला. जर ‘एमआयएम’ उमेदवाराची मते समाजवादी पक्षाला मिळाली असती, तर भाजपचा उमेदवार येथे 845 मतांनी हरला असता.

नकुड

सहारनपूर जिल्ह्यातील नकुड विधानसभा मतदार संघही मुस्लीम बहुल मानला जातो. येथे भाजपकडून मुकेश चौधरी रिंगणात होते. त्यांना 104114 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे धर्म सिंह सैनि यांना 103799 मते मिळाली. तर ‘एमआयएम’ उमेदवार रिजवाना यांना 3593 मते मिळाली. येथे समाजवादी पक्षाचा उमेदवार फक्त 315 मतांनी पराभूत झाला हे विशेष.

कुर्सी

बाराबंकी जिल्ह्यातील कुर्सी विधानसभा मतदार संघातही असेच झाले. या ठिकाणी भाजपचे सकेंद्र प्रताप यांना 118720 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे राकेश वर्मा यांना 118503 मते मिळाली, तर ‘एमआयएम’चे उमेदवार अशरफ खान यांना 8541 मते मिळाली. या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला 217 मतांनी भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला.

शाहगंज

जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज मतदार संघात भाजपने पहिल्यांदा विजय मिळवला. येथे भाजप युतीतील निषाद पक्षाचे उमेदवार रमेश सिंह यांना 86980 मते मिळाली. तर समाजवादी पक्षाच्या आघाडीचे शैलेंद्र यादव ललई यांना 86514 मते मिळाली. ‘एमआयएम’चे उमेदवार नयाब अहमद खान यांना 8128 मते मिळाली. या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला फक्त 468 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

सुलतानपूर

अवध भागातील सुलतानपूर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार विनोद सिंह यांना 92715 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे उमेदवार अनुप सांडा यांना 91706 मते मिळाली. येथे ‘एमआयएम’चे मिर्जा अकरम बेग यांना 5251 मते मिळाली. या जागी भाजपने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा 1009 मतांनी पराभव केला.

औराई

औराई विधानसभा मतदार संघात भाजप आणि समजावादी पक्षामध्ये काटे की टक्कर झाली. येथे भाजप उमेदवार दीनानाथ भास्कर यांना 93691 मते मिळाली. समाजवादी पक्षाचे उमेदवार अंजनी यांना 92044 मते मिळाली. तर ‘एमआयएम’च्या टेडाई यांना 2190 मते मिळाली. येथे भाजप उमेदवाराने समाजवादी पक्षाच्या उमेदवारावर फक्त 1647 मतांनी विजय मिळवलाय. फिरोजाबाद, जौनपूर, मुरादाबादनगर येथेही असेच चित्र पाहायला मिळाले.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?