आर्थिक अडचणीत तयार झाला चित्रपट, जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, पण या अभिनेत्याने घेतलं फक्त 1 रुपया मानधन, कोण आहे तो?
2024 मधील या चित्रपटाने जिंकला राष्ट्रीय पुरस्कार. यामधील अभिनेत्याने चित्रपटासाठी घेतलं फक्त 1 रुपये मानधन. आर्थिक अडचणींमध्ये तयार झालेला हा चित्रपट ठरला सुपरहिट.

2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्रीकांत’ या चित्रपटाने 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राजकुमार राव, शरद केळकर, ज्योतिका आणि अलाया एफ यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली. या चित्रपटाच्या यशामागे कलाकारांचे समर्पण, निर्मात्यांचा विश्वास आणि संपूर्ण टीमचे अथक परिश्रम असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले.
चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिग्दर्शक तुषार हीरानंदानी आणि निर्माती निधी परमार हीरानंदानी यांनी आनंद व्यक्त करत या चित्रपटाच्या निर्मितीमागील संघर्ष उलगडला. त्यांच्या मते, ‘श्रीकांत’ बनवणे मुळीच सोपे नव्हते. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक अडचणी, मर्यादित बजेट, चित्रीकरणाची आव्हाने आणि प्रदर्शनाच्या तारखांशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या. अनेक वेळा हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, संपूर्ण टीमने हार न मानता एकजुटीने काम केले आणि त्याचेच फळ आज राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळाले आहे.
आर्थिक अडचणीत तयार झालेला चित्रपट
तुषार हीरानंदानी यांनी सांगितले की, हा चित्रपट साकारण्यात कलाकारांच्या सहकार्याची सर्वात मोठी भूमिका होती. मुख्य भूमिकेत असलेल्या राजकुमार राव, ज्योतिका आणि अलाया एफ यांनी मानधनात मोठी कपात करत चित्रपटाला पाठबळ दिले. एवढेच नाही तर मेकअप आणि इतर निर्मिती खर्चातही कलाकारांनी निर्मात्यांना सहकार्य केले. विशेष म्हणजे अभिनेता शरद केळकर यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी केवळ एक रुपया मानधन स्वीकारले. चित्रपटाच्या कथानकावर असलेल्या विश्वासामुळे कोणत्याही कलाकाराने मानधनाचा किंवा पैशांचा मुद्दा निर्माण केला नाही.
आज राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण टीम भावूक झाली आहे. निर्मात्यांनी सांगितले की, जगातील सर्वोत्तम चित्रपट बनवल्याचा दावा ते करत नाहीत; मात्र, देशातील सर्वोच्च चित्रपट सन्मान मिळवण्याइतका दर्जेदार चित्रपट त्यांनी नक्कीच तयार केला. कलाकार, तांत्रिक टीम आणि निर्माता भूषण कुमार यांचे सहकार्य नसते, तर हा प्रवास पूर्ण होणे अशक्य होते. ‘श्रीकांत’चा राष्ट्रीय पुरस्कार हा केवळ एका चित्रपटाचा सन्मान नसून, चांगल्या कथानकावर विश्वास, टीमवर्क आणि समर्पणाच्या बळावर कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
दरम्यान, सुमारे 35 ते 47 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘श्रीकांत’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अंदाजे 56 ते 59 कोटी रुपये, तर जगभरात 60 ते 63 कोटी रुपयांची कमाई करत व्यावसायिकदृष्ट्याही समाधानकारक यश मिळवले.