किती वेळा पाहिलं तर मन भरत नाही, अनपढ पती-पत्नीच्या या चित्रपटाने जिंकली प्रेक्षकांची मनं, आजही प्रचंड क्रेझ
27 वर्षांपूर्वीचा सर्वात सुपरहिट चित्रपट, ज्यामध्ये बायको कमी शिकलेली असून देखील नवरा तिला जिद्दीच्या जोरावर बनवतो IAS अधिकारी. स्वत: सुरु करतो मोठा व्यवसाय. आजही लोक हा चित्रपट आवडीने बघतात.

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. काही हिट ठरतात आणि कालांतराने प्रेक्षकांच्या विस्मरणातही जातात. मात्र, काही चित्रपट असे असतात की त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम राहते. अमिताभ बच्चन यांच्या अशाच एका चित्रपटाची सध्या पुन्हा चर्चा होत आहे. 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाला आता 27 वर्षे झाली आहेत, मात्र आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोल साकारला होता. त्यांनी भानुप्रताप सिंह आणि त्यांचा मुलगा हीरा ठाकूर ही दोन्ही पात्रं साकारली होती. वडिलांकडून नाकारला गेलेला अशिक्षित मुलगा, त्याची पत्नी आणि त्यांच्या संघर्षाची ही कथा प्रेक्षकांना भावली.
पत्नी बनते IAS अधिकारी, तर पती उभा करतो स्वतःचा व्यवसाय
चित्रपटाची कथा हीरा आणि त्याची पत्नी राधा यांच्या आयुष्याभोवती फिरते. हीरा अशिक्षित असल्यामुळे त्याचे वडील भानुप्रताप त्याला नालायक समजून घराबाहेर काढतात. मात्र, राधा त्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगी त्याची साथ देते.
पत्नीला पुढे जाण्यासाठी हीरा तिच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना पाठिंबा देतो. राधा मेहनत करून IAS अधिकारी बनते, तर हीरा स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ट्रान्सपोर्ट व्यवसाय उभा करतो. घरातून हाकलून दिल्यानंतरही दोघे भानुप्रताप यांच्याबद्दलचा आदर कायम ठेवतात.
राधा IAS अधिकारी झाल्यानंतरही आपल्या सासऱ्यांचा आदर करते. त्यामुळे चित्रपटात केवळ कौटुंबिक संघर्ष नाही, तर नात्यांमधील प्रेम, त्याग, संघर्ष आणि आदर यांचं सुंदर चित्रण पाहायला मिळतं.
थिएटरमध्ये फ्लॉप, पण टीव्हीने बदललं चित्र
विशेष म्हणजे ‘सूर्यवंशम’ला थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळालं नव्हतं. सुमारे 7 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात जवळपास 6.67 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला, तर वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन सुमारे 12.64 कोटी रुपये राहिलं. त्यामुळे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फ्लॉप मानलं गेलं.
मात्र, टीव्हीवरील सततच्या प्रसारणामुळे या चित्रपटाचं नशीबच पालटलं. विशेषतः सोनी मॅक्सवरील रिपीट टेलीकास्टमुळे चित्रपट घराघरात पोहोचला. चित्रपटातील अनेक सीन्स आणि संवादांवर सोशल मीडियावर मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यामुळे ‘सूर्यवंशम’ला एक वेगळीच ओळख मिळाली. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की प्रेक्षक तो आवडीने पाहतात. याशिवाय यूट्यूबवरही चित्रपटाला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.