इच्छामरणावर आधारित ‘आता वेळ झाली’चा भावूक ट्रेलर पाहिलात का?

| Updated on: Feb 11, 2024 | 3:36 PM

इच्छामरण या विषयावर बॉलिवूडमध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता वयस्कांच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रोहिणी हट्टंगडी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर भावूक करणार आहे,

इच्छामरणावर आधारित आता वेळ झालीचा भावूक ट्रेलर पाहिलात का?
वयस्कांच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणार 'आता वेळ झाली'
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळेच इच्छामरण असावं की नसावं, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरु आहेत. या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल, या आशेवर जगणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणं विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा शेवट आनंदी हवा असेल तर तुम्हाला तुमची कथा कुठे संपवायची, हे माहित असणं आवश्यक आहे. आयुष्यात हे सूत्र जपणाऱ्या एका वयस्क जोडप्याच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणाऱ्या ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचा भावनिक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

पासष्टी पार केलेल्या शशिधर लेले आणि रंजना लेले यांची इच्छामरणाची परवानगी मिळवण्यासाठीची धडपड यात दिसत आहे. समाजाचा या विषयाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. यात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भारत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डेल्ल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म्स प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. तर इमॅजिन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत.

पहा ट्रेलर

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले, ”वयस्क व्यक्तींच्या अस्तित्वाची ही कथा आहे. कोणावरही भार म्हणून न जगता, अंथरुणाला खिळून न राहाता, जीवनाचा शेवट हा आनंदी व्हावा, अशा विचारसरणीच्या जोडप्याची ही कथा आहे. मात्र हा शेवट आनंदी करण्यासाठी त्यांना दिव्यातून जावं लागतं.” अखेर हे जोडपं काय निर्णय घेते, याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहे. आपण सन्मानाने का मरू शकत नाही? हा गहन प्रश्न उपस्थित करणारा ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट येत्या 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.