‘मुस्लीम असल्याच्या नात्याने मी हिंदूंची..’; पहलगाम हल्ल्यावर हिना खानची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री हिना खानने पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सर्व हिंदूंची आणि भारतीयांची माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले, तर 20 हून अधिक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडसह टीव्ही क्षेत्रातील कलाकारांनीही यावरून राग व्यक्त केला आहे. अशातच अभिनेत्री हिना खानची पोस्ट चर्चेत आली आहे. हिनाने मुस्लीम असल्याच्या नात्याने सर्व हिंदू आणि भारतीयांची माफी मागितली आहे. त्याचसोबत पहलगाम हल्ल्याचा तिच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचंही तिने म्हटलंय.
हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ‘संवेदना.. काळा दिवस.. पाणावलेले डोळे. निंदा, करुणेची हाक. जर आपण वास्तवाला स्वीकारण्यास अपयशी ठरत असू तर बाकी काहीच महत्त्वाचं नाही. जर आपण खरोखर काय घडलं हे मान्य केलं नाही, विशेषकरून मुस्लीम म्हणून, तर बाकी सर्व काही फक्त चर्चा आहेत. साध्या गोष्टी.. काही ट्विट्स.. आणि बस्स! मुस्लीम असल्याचा दावा करणाऱ्या अमानुष, ब्रेनवॉश केलेल्या दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने हा हल्ला केला, ते भयानक आहे. एखाद्या मुस्लिमाला बंदुकीच्या धाकावर धर्मांतर करण्यास भाग पाडून त्याला नंतर मारलं तर, याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझं मन प्रचंड दुखावलं गेलं आहे.’
या पोस्टमध्ये हिनाने हिंदूंची आणि सर्व भारतीयांची माफी मागितली आहे. ‘एक मुस्लीम असल्याच्या नात्याने मी सर्व हिंदूंची आणि भारतीयांची माफी मागते. एक भारतीय म्हणून मन मोडलंय. एक मुस्लीम म्हणून मन मोडलंय. परंतु हे माझ्याबद्दल किंवा माझ्या वेदनांबद्दल नाही. हे त्या प्रत्येकाच्या वेदना आहेत, ज्यांनी त्यांच्या आप्तस्वकियांना गमावलंय. पहलगाममध्ये जे झालं, ते मी विसरू शकत नाही. या घटनेचा माझ्यावर आणि माझ्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. हे ते दु:ख आहे जे प्रत्येक भारतीय अनुभवतोय. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते की त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो’, असं तिने लिहिलंय.
‘मी या हल्ल्याचा निषेध करते. मी हे नाकारते. ज्यांनी हा हल्ला केला त्यांचा मी द्वेष करते.. संपूर्ण मनाने, खरोखरच आणि कोणत्याही शर्तीविना. ज्यांनी हे केलंय ते कोणत्याही धर्माचं पालन करू शकतात. माझ्यासाठी ते माणूस नाहीत. काही मुस्लिमांच्या कृत्यामुळे मला मुस्लीम असल्याची लाज वाटतेय. मी माझ्या सहभारतीयांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना वेगळं करू नये. आम्ही सर्वजण जे भारताला आमचं घर आणि आमची मातृभूमी म्हणतो. जर आपणच एकमेकांमध्ये भांडत बसलो तर ते त्यांच्या कार्यात यशस्वी ठरतील. त्यांना आपल्यात विभाजन करून भांडणं लावायची आहेत. भारतीय म्हणून आपण हे होऊ देता कामा नये. एक भारतीय म्हणून मी माझ्या देशासोबत, सुरक्षा व्यवस्थेसोबत उभी आहे आणि देशाला पाठिंबा देते. माझ्या सुंदर देशात सर्व धर्म सुरक्षित आणि एकसमान आहेत. या घटनेचा सूड घेण्याच्या माझ्या देशाच्या संकल्पनेला मी बिनशर्त पाठिंबा देते, यात कोणतीचं कारणं नाहीत किंवा प्रश्न नाहीत’, असंही हिनाने म्हटलंय. या पोस्टच्या अखेरीस हिनाने सर्वांना एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढण्याचं आवाहन केलंय.