दिलीप जोशी यांना कशी मिळाली ‘जेठालाल’ची ऑफर? निर्मात्यांनी दिलेले 2 पर्याय
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दिलीप जोशी हे या मालिकेत गेल्या अठरा वर्षांपासून जेठालालची भूमिका साकारत आहेत. पण त्यांना ही भूमिका कशी मिळाली, हे तुम्हाला माहीत आहे का?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तरी जेठालालची भूमिका पाहताना एक वेगळीच मजा येते. अभिनेते दिलीप जोशी हे या मालिकेत गेल्या 18 वर्षांपासून जेठालालची भूमिका साकारत आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग, चेहऱ्यावरील हावभाव यांच्या आधारे त्यांनी ही भूमिका आणखी खुलवली आहे. पण दिलीप जोशी यांना जेठालालची भूमिका कशी मिळाली, हे तुम्हाला माहीत आहे का? दिलीप यांना खरंतर दोन भूमिकांचे पर्याय देण्यात आले होते, त्यापैकी त्यांनी जेठालालची निवड केली.
अशी मिळाली जेठालालची भूमिका
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशी म्हणाले, “मी कोणतंच ऑडिशन दिलं नव्हतं. किंबहुना असित भाईंनी मला पर्याय दिला होता की तुम्हाला कोणती भूमिका साकारायची आहे ते तुम्ही निवडा. चंपकलाल आणि जेठालाल असे दोन पर्याय त्यांनी मला दिले होते. तारक मेहताचं कॉलम आम्ही लहानपणापासून वाचत आलो आहोत. त्यामुळे मला भूमिकांविषयी बरीच माहिती होती. मी चंपकलाल गडा यांच्यासारखा दिसलोच नसतो, वयस्कर भूमिका माझ्यावर चांगली दिसली नसती. जेठालालचंही जे कॉलम होतं, त्यातील चित्रात तो बारिक अंगकाठीचा, चार्ली चॅप्लीनसारखी मिशी असलेला होता. तर मी गोलू-मोलू आहे. त्यामुळे मी असं म्हटलं होतं की जेठालालच्या भूमिकेसाठी मी प्रयत्न करू शकतो. तेव्हा असित भाई म्हणाले, ठीक आहे.”
दिलीप जोशी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात वयाच्या 12 व्या वर्षापासूनच केली होती. गुजराती थिएटरमध्ये ते काम करायचे. कॉलेजच्या दिवसांतही त्यांनी अभिनयासाठी विविध पुरस्कार पटकावले आहेत. ‘तारक मेहता..’चे निर्माते असित मोदी हे त्यांना आधीपासूनच ओळखत होते. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये काम करताना त्यांना एका दिवसाचं 50 रुपये मानधन मिळायचं. त्यानंतर त्यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी 420’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.