तिसरं लग्न कधी करतोय? कपिल शर्माचा आमिर खानला सवाल, पहा व्हिडीओ

| Updated on: Apr 24, 2024 | 1:17 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली. यावेळी कॉमेडियन कपिल शर्माने त्याला अत्यंत खासगी प्रश्न विचारला. "तू सेटल कधी होणार आहेस", असा प्रश्न विचारताच आमिरचा चेहरा पाहण्यासारखा होता.

तिसरं लग्न कधी करतोय? कपिल शर्माचा आमिर खानला सवाल, पहा व्हिडीओ
Aamir Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान उपस्थित राहणार आहे. त्याचा रंजक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये कपिल त्याच्या विनोदी शैलीत आमिरला विविध प्रश्न विचारतो. एपिसोडमध्ये किती धमाल होणार आहे, याची झलक या प्रोमोमध्ये पहायला मिळतेय. आमिर खान त्याच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल, कुटुंबीयांबद्दल आणि अवॉर्ड शोमधील अनुपस्थितीबद्दल मोकळेपणे व्यक्त होतो. पण प्रोमोच्या अखेरीस जेव्हा कपिल शर्मा त्याला विचारतो की, “तू सेटल कधी होणार आहेस?”, तेव्हा आमिरचा चेहरा बघण्यासारखा होतो.

या प्रोमोमध्ये कपिल शर्मा आमिरच्या चित्रपटांचा उल्लेख करतो. त्यावर आमिर सांगतो, “माझे मागचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते.” यानंतर आमिर म्हणतो की त्याची मुलं त्याचं काहीच ऐकत नाही. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. शोमध्ये येण्याआधी कपड्यांवरून घरात खूपच चर्चा झाली, असंही तो सांगतो. त्यानंतर अर्चना पुरण सिंह त्याला म्हणते की, “तू चांगलेच कपडे परिधान केले आहेस.” तेव्हा आमिर तिला समजावतो की, “मी शोमध्ये शॉर्ट्स घालून येणार होतो, पण त्यांनी जीन्स घालायला सांगितलं.”

हे सुद्धा वाचा

आमिर कधीच कोणत्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत नाही. त्यामागचं कारण त्याने आजवर कधीच सांगितलं होतं. पण कपिलच्या शोमध्ये जेव्हा अर्चनाने आमिरला याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला, “वेळ खूप मोलाची असते, त्यामुळे ती तुम्ही अत्यंत हुशारीने वापरली पाहिजे.” या प्रोमोच्या अखेरीस कपिल आमिरला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो. “तू सेटल कधी होणार आहेस”, असं विचारल्यानंतर आमिरचा चेहरा पाहण्यासारखा होतो. आता या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रेक्षकांना ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्येच पहायला मिळेल.

आमिरने याआधी रिना दत्ता आणि किरण राव यांच्याशी लग्न केलं होतं. घटस्फोटानंतरही आमिरचं या दोघींसोबत मैत्रीपूर्ण नातं आहे. आमिर आणि रिना यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. तर किरण आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे.