गर्दीनं डोकं फिरलं अन् ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ सूचलं; वाचा अफलातून किस्सा!

| Updated on: Mar 22, 2021 | 5:34 PM

प्रसिद्ध गीतकार मधुकर घुसळे यांच्या 'कारभारी दमानं...; या गाण्याचा किस्सा आपण काल वाचला. (know about lyricist madhukar ghusle)

गर्दीनं डोकं फिरलं अन् डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया... सूचलं; वाचा अफलातून किस्सा!
madhukar ghusle
Follow us on

मुंबई: प्रसिद्ध गीतकार मधुकर घुसळे यांच्या ‘कारभारी दमानं…; या गाण्याचा किस्सा आपण काल वाचला. आज त्यांच्या ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ या गाण्याचा किस्सा ऐकणार आहोत. ही दोन्ही लोकप्रिय गीते घुसळे यांनी लिहिली आहेत. पण ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. त्यांनी कधीही स्वत:ला मिरवून घेतलं नाही आणि प्रसिद्धीच्या मागेही कधी लागले नाहीत. अत्यंत शांत, संयमी स्वभाव असलेल्या घुसळे यांच्या गाण्याचा हा किस्सा वाचाच! (know about lyricist madhukar ghusle)

असं फिरलं डोकं…

‘एक वरमाय रुसली’ या गाण्याचं रेकॉर्डिंग संपवून गीतकार मानवेल गायकवाड आणि मधुकर घुसळे घरी निघाले होते. दोघेही लोकलनं निघाले होते. त्यावेळी लोकलला गर्दी खूप होती. या गर्दीमुळे घुसळे यांचं डोकं फिरलं. पण या डोकं फिरल्यामुळे त्यांना गाणं सूचलं आणि हे गाणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. हे गाणं होतं…

डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया,
हाताला धरलंया, म्हणून ते लगीन ठरलंया…

गुरुची शब्दांवरील मांड

आंबेडकरी गीतकार दलितानंद बाबा हे घुसळेंचे गुरू. दलितानंद बाबांचे शब्दांवर सामर्थ्य होते. एकदा घुसळेंनी त्यांच्या गीतात ‘कष्ट साहून’ असा शब्द वापरला. तो दलितानंद बाबांना खटकला. त्यांनी लगेच घुसळेंना बोलावलं आणि ‘कष्ट करून’ असा शब्द वापरण्यास सांगितले. ‘कष्ट केले’ जातात. कष्ट कधीच सोसले जात नाहीत. त्यामुळे ‘कष्ट साहून’ ऐवजी ‘कष्ट करून’ हा शब्द त्यांनी वापरण्यास सांगितलं. दलितानंद बाबांचं शब्दांवरील सामर्थ्य पाहूनच मी त्यांचे शिष्यत्व पत्करल्याचेही त्यांनी सांगितलं.

गीतकार म्हणून असे घडले…

घरात गाणं आणि संगीत याचा मागमूस नसतानाही घुसळे या क्षेत्राकडे वळले. गाण्याशी दूरदूरचाही संबंध नसताना केवळ गायकांच्या संपर्कात आल्याने त्यांना गाणं लिहिण्याची गोडी लागली. कल्याणच्या वालधुनीमधील अशोक नगरात ते राहत होते. भीम जयंती, बुद्ध जयंतीला वस्तीत गायनपार्ट्यांचे कार्यक्रम होत होते. घुसळे बालपणापासून हे कार्यक्रम पाहत होते. त्यांच्यावर गाण्यांचे संस्कार होत होते. घुसळेंच्या वडिलांचे कलावंतांसोबत चांगले संबंध होते. त्यामुळे ही कलावंत मंडळी घुसळे यांच्या घरी दोन दोन महिने मुक्कामाला असायची. त्यामुळे घरातच मैफली रंगायच्या. कलावंतांच्या चर्चा कानावर यायच्या. गाणं कसं तयार केलं जातं, चाल कशी बांधली जाते, गायक स्वर कसा लावतात या सर्व गोष्टींचं ते निरीक्षण करत होते. त्यातूनच त्यांची गीतकार म्हणून जडणघडण झाली. वयाच्या 15-16 व्या वर्षांपासूनच ते गाणं लिहू लागले. विशेष म्हणजे या वयातही त्यांना ऱ्हिदमचा चांगला अंदाज आला होता.

रंजना शिंदेंनी सर्वात आधी गाणी गायली

“मी गाणं लिहायचो हे वडिलांना माहीत होते. त्यांनी त्यावेळच्या प्रसिद्ध गायिका रंजना शिंदे यांचे पती जगदीश शिंदे तसेच जानू जाधव यांच्याकडे माझ्या गाण्याचा विषय काढला. त्यानंतर या दोघांनीही घरी येऊन माझी चोपडी तपासली. त्यांना माझी काही गाणी आवडली. त्यातली काही गाणी त्यांनी रंजना शिंदे यांना दिली. रंजना शिंदे यांनी सर्वात आधी माझी गाणी गायली. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज ठाण्यातील दलित समाजातील सर्व गायक माझी गाणं गातात”, असं घुसळे यांनी सांगितलं होतं.

गायन पार्टीही काढली

घुसळे यांनी रमेश वाकचौरे यांच्या साथीने ‘मनोरमा गायन पार्टी’ची स्थापना केली होती. विशेष म्हणजे घुसळे आणि चौरे दोघेही ‘मनोरमा’ नावानेच गाणी लिहायचे. पुढे त्यांनी मुलाच्या नावाने गीत लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे गीताच्या शेवटच्या कडव्यात त्यांच्या मुलाचं नाव येतं. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about lyricist madhukar ghusle)

संबंधित बातम्या:

‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं’चा कारभारी कोण माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा

टिनपाटच्या डब्यावर ताल शिकले, इराण्याच्या हॉटेलबाहेर गाणं; असे घडले विठ्ठल शिंदे!

‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!

(know about lyricist madhukar ghusle)