
मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु हा अपघात अशा ठिकाणी झाला, जिथे त्याला सहज मदत मिळणं शक्य नव्हतं. अखेर त्याची गाडी टोईंगने मुंबईपर्यंत आणली गेली. या संपूर्ण सहा ते सात तासांच्या प्रवासादरम्यान सुयश त्याच्या बंद गाडीतच बसून होता. परंतु या संपूर्ण घटनेचा त्याने व्हिडीओ शूट केला असून तोच आता इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, ज्यांचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो, ही गोष्ट त्याला या घटनेतून शिकायला मिळाली.
‘गाडी न चालवताच सर्वांत लांब ड्राइव्हिंग झाली. माझ्या गाडीचा छोटा अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं. या अपघातात मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही. पण ही घटना अशा ठिकाणी झाली, जिथे मला मदत मिळत नव्हती. मग घरी परतण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे मुंबईला घरापर्यंत माझी गाडी टोईंग करून नेणं. जवळपास तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मला मदत मिळाली. गाडी टो करणाऱ्या ड्राइव्हरने मला माझ्या गाडीतच बसायला सांगितलं. “जर कदाचित गाडीला काही मदत लागली तर..” असं तो म्हणाला. मदत? ती श्वासही घेत नाही,’ असं सुयशने उपरोधिकपणे लिहिलं.
याविषयी तो पुढे म्हणाला, ‘मला मौन बाळगून माझ्या गाडीत बसावं लागलं. एसी नसलेल्या त्या गाडीतून मला सहा ते सात तास हायवेवरून ओढत नेण्यात आलं. लोक कुतुहलाने माझ्याकडे आणि गाडीकडे बघत होते, काही जण माझ्या नशिबावर हसत होते, तर नेमकं काय झालंय, असा प्रश्न काहींना पडला होता. अशा परिस्थितीत माझा राग अनावर झाला असता, मी चिडू शकलो असतो, मी तक्रारी करत बसू शकलो असतो. परंतु कधी कधी आयुष्य तुम्हाला जे अनुभव देईल, त्याचा फक्त स्वीकार करायचा असतो.’
‘मी पुस्तक वाचलं, गाणी ऐकली, झोप काढली. गाडीच्या असामान्य हलत्या थिएटर सीटवरून मी जग फिरताना पाहिलं. माझ्या संपूर्ण दिवसाचा मी व्हिडीओ काढला आणि त्या मोठ्या व्हिडीओचा मिनी व्लॉग तयार केला. तुम्हीसुद्धा एंजॉय करा. कधीकधी, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, आयुष्य तुम्हाला ओढून नेत असते. तुम्ही हा प्रवास रागात घालवू शकता किंवा तुमची खिडकी उघडून मोकळा श्वास घेऊ शकता आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकता,’ असं त्याने पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.
या व्हिडीओच्या अखेरीस त्याने एक गमतीशीर संदेशसुद्धा लिहिला आहे. ‘जेव्हा आयुष्य तुम्हाला लिंबू देतं, तेव्हा त्यातून लिंबू सरबत बनवा’ अशी एक म्हण सर्वांनाच माहीत असेल. परंतु सुयशने याच म्हणीचा एक वेगळा व्हर्जन चाहत्यांना सांगितला आहे. ‘जेव्हा आयुष्य तुम्हाला लिंबू देतं, तेव्हा आंब्याचा ज्युस बनवा आणि सर्वांनाच चकीत करा’, असं त्याने लिहिलंय. सुयशच्या या व्हिडीओ आणि पोस्टवर नेटकऱ्यांकडून आणि सेलिब्रिटींकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत.