“खूप मोठा गैरसमज यानिमित्ताने दूर होईल”; ‘धर्मवीर’मधील आनंद दिघेंच्या भूमिकेविषयी काय म्हणाला प्रसाद ओक?

| Updated on: Apr 24, 2022 | 4:13 PM

लोकनेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे.

खूप मोठा गैरसमज यानिमित्ताने दूर होईल; धर्मवीरमधील आनंद दिघेंच्या भूमिकेविषयी काय म्हणाला प्रसाद ओक?
Dharmaveer
Image Credit source: Youtube
Follow us on

लोकनेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. प्रसादचा लूक हुबेहूब आनंद दिघेंसारखाच असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनीही दिली. या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम नुकताच पार पडला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रसादने भूमिकेविषयी त्याची प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे “दिघे साहेबांनी माझ्यावरचा अन्याय दूर केला”, अशी भावना त्याने व्यक्त केली. ठाण्याचा वाघ म्हणून ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावरील हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

काय म्हणाला प्रसाद ओक?

आनंद दिघेंच्या लूकवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं प्रसादने यावेळी सांगितलं. “आम्हाला कळलंच नाही की तू आहेस, आम्हाला असं वाटलं की साहेबच पुन्हा अवतरले, इतका हुबेहूब.. अशा जनसामान्यांकडून प्रतिक्रिया आल्याच पण त्यांच्या कुटुंबीयांकडून, शिंदे साहेबांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. आमच्या संपूर्ण टीमने जे कष्ट घेतले, त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. 55 दिवसांच्या शूटिंगमध्ये मी दररोज प्रविणला विचारत होतो की बरोबर चाललंय ना? दिघेसाहेबांची जी प्रतिमा समाजामध्ये आजही आहे, त्यांना जाऊन 21 वर्षे झाली, पण 21 वर्षांनंतरही ज्यापद्धतीने लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत, त्यांचे भक्त आहेत, शिष्य आहेत, त्या भावनेला जरासुद्धा धक्का लागेल असं काहीही करून चालणार नव्हतं. त्यामुळे प्रचंड मोठी जबाबदारी होती. पण ती प्रवीणच्या मदतीने मला पेलता आली,” असं तो एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

“प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला एक चांगली भूमिका यावी आणि तसा मी बरा अभिनेता आहे. एक मोठा रोल माझ्या आयुष्यात मला मिळायचा बाकी आहे, असं मला खूप वर्षांपासून वाटत होतं. 2015-16 ला कच्चा लिंबू आला, त्यानंतर माझी सहा वर्षे माझ्या तीन चित्रपटांसाठी गेली. लोकांना असं वाटायला लागलं की मी अॅक्टिंग सोडली, आता फक्त दिग्दर्शनच करणार. पण हा खूप मोठा गैरसमज या चित्रपटाच्या निमित्ताने पुसला जाईल,” असं तो पुढे म्हणाला.

हेही वाचा:

KGF 2: थांबायचं न्हाय आता थांबायचं न्हाय! 11 दिवसांत ‘केजीएफ 2’च्या कमाईचा थक्क करणारा आकडा

जिच्यासाठी विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात केला राडा; तीच घेणार घटस्फोट?