Naseeruddin Shah | ‘हा एक धोकादायक ट्रेंड’; ‘द केरळ स्टोरी’विषयी असं का म्हणाले नसीरुद्दीन शाह?

| Updated on: May 31, 2023 | 4:50 PM

"पण दुसऱ्या बाजूला, मला अशीही आशा आहे की हे द्वेषाचं हे वातावरण कधीतरी थकवणारं ठरेल. द्वेष पसरवत तुम्ही किती पुढे जाऊ शकता? मला वाटतं आणि आशा आहे की ज्याप्रकारे त्यांनी अचानक आपल्याला वेढलंय, ते देखील नाहीसं होईल. पण हे सर्व लवकर होणार नाही", असंही ते पुढे म्हणाले.

Naseeruddin Shah | हा एक धोकादायक ट्रेंड; द केरळ स्टोरीविषयी असं का म्हणाले नसीरुद्दीन शाह?
Naseeruddin Shah on The Kerala Story
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विविध मुद्द्यांवर ते त्यांची मतं स्पष्टपणे मांडतात. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला होता. आता आणखी एका मुलाखतीत ते ‘द केरळ स्टोरी’विषयी मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. “भीड, अफवाह, फराझ यांसारखे दमदार चित्रपट फ्लॉप ठरले. कोणीच ते चित्रपट बघायला गेलं नाही. पण द केरळ स्टोरीसाठी लोक गर्दी करत आहेत. तो चित्रपट मी पाहिला नाही आणि पाहण्याची माझी इच्छाही नाही. कारण त्याबद्दल मी पुरेसं वाचलं आहे”, असं ते म्हणाले.

इतकंच नव्हे तर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या यशाला नसीरुद्दीन शाह ‘धोकादायक ट्रेंड’ असं म्हणाले. नाझी जर्मनीशी त्यांनी त्याची तुलना केली. “एका बाजूला, हा धोकादायक ट्रेंड आहे, त्यात काही शंका नाही. आपण नाझी जर्मनीच्या वाटेवर जात आहोत असं दिसतंय. जिथे हिटलरच्या काळात चित्रपट निर्मात्यांना सहनियुक्त केलं गेलं, तसं करण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकडून ते सर्वोच्च नेत्याची प्रशंसा करणारे चित्रपट बनवतील. त्या सर्वोच्च नेत्याने देशवासियांसाठी काय केलं आणि ज्यू समुदायाचं कशा पद्धतीने खच्चीकरण केलं हे त्यात दाखवू शकतील. जर्मनीतील अनेक मास्टर फिल्ममेकर्स ते ठिकाण सोडून हॉलिवूडला आला आणि तिथे त्यांनी चित्रपट बनवले. इथेही तेच होताना दिसतंय. एकतर उजव्या बाजूला रहा, तटस्थ राहा किंवा प्रस्थापितांच्या बाजूने व्हा”, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

“पण दुसऱ्या बाजूला, मला अशीही आशा आहे की हे द्वेषाचं हे वातावरण कधीतरी थकवणारं ठरेल. द्वेष पसरवत तुम्ही किती पुढे जाऊ शकता? मला वाटतं आणि आशा आहे की ज्याप्रकारे त्यांनी अचानक आपल्याला वेढलंय, ते देखील नाहीसं होईल. पण हे सर्व लवकर होणार नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कलाकारांना आवाज उठवल्याचं आवाहन केलं होतं. “कट्टरता, प्रचारकी आणि दुष्प्रचार पसरवण्यासाठी बनवल्या गेलेल्या चित्रपटांविरोधात लढण्याचा एकमेव मार्ग आहे की कलाकारांनी आपला आवाज उठवला पाहिजे. मात्र असे कलाकार इंडस्ट्रीत फारसे नाहीत”, असं ते म्हणाले होते.