महाराष्ट्राची ‘मर्लिन मनरो’ आणि ‘सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’, पद्मा चव्हाणचा अचानक मृत्यू कसा झाला?

मराठी बरोबरच हिंदी सिनेमातही पद्मा यांनी आपली छाप पाडली. "आदमी", "बिन बादल बरसात" आणि "कश्मीर की कली"मध्ये शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत त्यांनी भूमिका केल्या. पण त्यांचा शेवट हा अतिशय वाईट होता.

महाराष्ट्राची मर्लिन मनरो आणि सौंदर्याचा अॅटम बॉम्ब, पद्मा चव्हाणचा अचानक मृत्यू कसा झाला?
padma chavan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 20, 2025 | 7:51 PM

मराठी सिनेसृष्टीत “महाराष्ट्राची मर्लिन मनरो” किंवा “सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” अशी उपाधी मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे पद्मा चव्हाण. आचार्य अत्रे यांनी “लाखात अशी देखणी” या नाटकातील तिच्या अभिनयाने प्रभावित होऊन तिला हा किताब दिला होता. निखळ सौंदर्य आणि बोलके डोळे असलेल्या पद्मा यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.

मूळच्या कोल्हापूरच्या सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या होत्या. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाच्या ओढीने शिक्षण सोडले आणि चंदेरी दुनियेत पदार्पण केले. जन्मजात आकर्षक व्यक्तिमत्व आणि सुरेख चेहर्‍यामुळे त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी, १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या “आकाशगंगा” या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

“नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल”, “माझी बायको माझी मेव्हणी” मधील रसिका, “लग्नाची बेदी” मधील रश्मी अशा भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. त्यांनी “अवघाची संसार”, “जोतीबाचा नवस”, “संगत जडली तुझी न माझी”, “बोट लावीन तिथे गुदगुल्या”, “लाखात अशी देखणी” अशा सुमारे २८ मराठी चित्रपटांमध्ये काम केले. १९६६ मध्ये दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

मराठी बरोबरच हिंदी सिनेमातही पद्मा यांनी आपली छाप पाडली. “आदमी”, “बिन बादल बरसात” आणि “कश्मीर की कली”मध्ये शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत त्यांनी भूमिका केल्या. बऱ्याचदा निगेटिव्ह भूमिका साकारल्या. मराठीत “या सुखांनो या” आणि “आराम हराम है” या चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच त्यांचे खाजगी आयुष्य मात्र बिनधास्त आणि वादग्रस्त राहिले.

पद्मा यांचे बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी जवळचे संबंध होते, असे म्हटले जायचे. खोत यांनी तर पद्मा यांच्याशी लग्न झाल्याचा दावा केला होता. मात्र नंतर दोघांमध्ये गंभीर वाद निर्माण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की पद्मा यांनी चंद्रकांत खोत यांच्यावर फसवणुकीचा खटला दाखल केला. हा खटला कोर्टात १०-११ वर्षे रखडला. दुर्दैवाने, खटला सुरू असतानाच १२ सप्टेंबर १९९६ रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी सिनेसृष्टीने एक अतुलनीय सौंदर्य आणि अभिनयाची देणगी गमावली. आजही त्यांच्या भूमिका आणि सौंदर्याच्या चर्चा होतात, पण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस मात्र वाद आणि दुर्घटनेच्या सावलीत संपले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us