तिच्या सौंदर्याने भले-भले घायाळ होतात, ‘या’ अभिनेत्रीने कोणत्या क्रिकेटरचा मागितला राजीनामा?
एका अभिनेत्रीने थेट पाकिस्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन आणि संघाचा राजीनामा मागितला आहे. ही अभिनेत्री याआधीही अशा पद्धतीच्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत होती. आता पुन्हा एकदा तिच्या ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण यावेळी तिने थेट क्रिकेटर्सचा राजीनामा मागितला आहे.

मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील पाकिस्तान क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स पाहून अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. सहर शिनवारी ही पाकिस्तानी अभिनेत्री नेहमीच तिच्या ट्विट्समुळे चर्चेत असते. ऑस्ट्रेलिया विरोधातील सामन्यात पाकिस्तानच्या संघाला अपयश मिळाल्यानंतर तिने आणखी एक ट्विट केलं आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ‘पाकिस्तानी क्रिकेट टीमला फक्त धार्मिक किंवा राजकीय वक्तव्ये करून चाहत्यांना मूर्ख बनवता येतं. मात्र परफॉर्मन्स देणं त्यांना झेपत नाही’, असं तिने या ट्विटमध्ये म्हटलंय.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना सुरू असतानाही तिने एक ट्विट केलं होतं. ‘जोपर्यंत बाबर आझमसोबत संपूर्ण क्रिकेट टीम राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आम्ही पाकिस्तानच्या रस्त्यावर आंदोलनं करू’, असं तिने त्यात लिहिलं होतं. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा जेव्हा भारताने पराभव केला, तेव्हासुद्धा तिने कॅप्टन बाबर आझमविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचा दावा केला होता. इतकंच नव्हे तर वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश टीमने भारताचा पराभव केला तर बांगलादेशी क्रिकेटर्ससोबत डिनर डेटला जाणार असल्याचं तिने म्हटलं होतं.
कोण आहे ही अभिनेत्री?
बांगलादेशच्या क्रिकेटर्ससोबत डिनर डेटवर जाण्याबद्दल ट्विट करणारी ही अभिनेत्री पाकिस्तानी आहे. सहर शिनवारी असं तिचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सहरचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. कोहट परिसरातील शिनवारी समुदायाच्या सहरने 2014 मध्ये ‘शेर सव्वाशेर’ या कॉमेडी मालिकेतून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2015 मध्ये तिने कराचीमधील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं.
वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत
सहर अशा पद्धतीच्या ट्विटमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कपदरम्यान सहरने केलेलं ट्विट चर्चेत आलं होतं. जर झिम्बाब्वेच्या टीमने भारताला हरवलं तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन, असंच तिने थेट म्हटलं होतं. सहरने श्रीलंका आणि भारत यांच्या मॅचदरम्यानही एक ट्विट केलं होतं. इतकंच नव्हे तर गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीही तिने भाजपच्या पराभवाविषयी ट्विट केलं होतं. ‘गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. असं न झाल्यास मला जे काही म्हणायचं असेल ते म्हणा’, असं तिने लिहिलं होतं. मात्र जेव्हा भाजपने ही निवडणूक जिंकली, तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.