
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा अली मजारी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. या मल्टीस्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत नवे विक्रम रचले. ‘धुरंधर’ने तब्बल 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. इतक्या मोठ्या यशानंतरही रणवीरचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. ‘धुरंधर’ने रणवीरच्या करिअरला एक वेगळं वळण दिलं असलं तरी त्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामागचं कारण म्हणजे ‘डॉन 3’ हा चित्रपट. या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’चे निर्माते एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यात मोठा वाद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहने अचानक हा चित्रपट सोडला होता आणि त्यामुळे प्रॉडक्शन कंपनी, स्टुडिओचं मोठं नुकसान झालं होतं. ‘व्हरायटी इंडिया’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, एक्सेल एंटरटेन्मेंटने आता रणवीरकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या कंपनीने रणवीरकडे थेट 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे. रणवीरने चित्रपट अचानक सोडल्यामुळे पैसा, शेड्युलिंग, प्लॅनिंग, कमिटमेंट्सची दिरंगाई असं बरंच नुकसान झेलावं लागल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय प्रॉडक्शन हाऊसने काही डिपार्टमेंट्सनाही काढून टाकलं आहे. डिपार्टमेंटच्या प्रमुखांना बाहेर काम शोधण्यास सांगितलं गेलं आहे.
दुसरीकडे एक्सेल एंटरटेन्मेंटला मी कोणतीही रक्कम किंवा नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसल्याचं रणवीर सिंहने स्पष्ट केलं आहे. रणवीरच्या मते त्याने आधीही कोणत्याही नुकसान भरपाईच्या मागणशिवाय प्रोजेक्ट्समधून माघार घेतली आहे. त्यामुळे या परिस्थितीला वेगळं वळण देऊ नये, असं त्याने म्हटलंय. रणवीरला या चित्रपटाची पटकथा आवडली नव्हती. यामुळेच त्याने हा चित्रपट सोडला होता.
रिपोर्ट्समध्ये असंही लिहिलंय की, रणवीरने सतत पटकथेत बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीसुद्धा त्याला फायनल ड्राफ्ट आवडला नव्हता. तर प्रॉडक्शन हाऊसने दावा केला की त्यांनी तोपर्यंत प्री-प्रॉडक्शनला सुरुवात केली होती. रणवीर आणि प्रॉडक्शन हाऊसदरम्यान शुक्रवारी जवळपास दोन तास चर्चा झाली. परंतु या चर्चेतून तोडगा निघालाच नाही.
रणवीर सिंह आता ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागासाठी त्याने जवळपास 30 ते 40 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.