आंटीच्या अड्डयावर रेड पडली अन् ‘आंटीची घंटी’ सूचलं; वाचा, नादावणाऱ्या गाण्याचा किस्सा

| Updated on: Mar 26, 2021 | 6:34 PM

आनंद-मिलिंद शिंदे यांनी या जोडगळीने अनेक भन्नाट आणि लोकप्रिय गाणी गायली. (read about manvel gaikwad's famous song 'antichi ghanti mi vajavali')

आंटीच्या अड्डयावर रेड पडली अन् आंटीची घंटी सूचलं; वाचा, नादावणाऱ्या गाण्याचा किस्सा
manvel gaikwad
Follow us on

मुंबई: आनंद-मिलिंद शिंदे यांनी या जोडगळीने अनेक भन्नाट आणि लोकप्रिय गाणी गायली. त्यांची लोकगीतं सर्वाधिक गाजली. आजही त्यांची गाणी ठेका धरायला लावतात. या दोन्ही गायकांना अनेक गीतकारांनी गीते दिली. पण मानवेल गायकवाड यांनी लिहिलेली गीते काही औरच होती. मानवेल गायकवाड यांनीच लिहिलेल्या ‘जवा नवीन पोपट’ हा या गाण्यामुळे शिंदे बंधू स्टार झाले. या गाण्याला 20 हून अधिक वर्ष लोटली. परंतु आजही आनंद शिंदे यांना या गाण्याची फर्माईश केली जाते. मानवेल गायकवाड यांचं आंटीची घंटी हे गाणंही तितकंच लोकप्रिय आहे. हे गाणं त्यांना कसं सूचलं? त्याचाच हा किस्सा. (read about manvel gaikwad’s famous song ‘antichi ghanti mi vajavali’)

मित्राने रेड पडल्याचं सांगितलं अन्

मानवेल गायकवाड यांचे मित्र रामचंद्र पाटील हे कल्याणच्या चिकनघरमध्ये राहत होते. गायकवाड या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्याच्या आदल्या रात्री पाटील यांच्या बाजूला असलेल्या आंटीच्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड पडली होती. विशेष म्हणजे या अड्ड्यावर धाड मारणारे पोलीसही नकली होते. कुणी तरी आंटीला बनवलं होतं. त्याची चिकनघरमध्ये जोरात चर्चा सुरू होती. गायकवाड घरी आल्यानंतर पाटील त्यांना हा किस्सा रंगवून सांगत होते. तेवढ्यात कुणी तरी ‘काल रात्री आंटीची घंटी वाजली’, असं उद्गार काढले. झालं. गायकवाड यांच्या डोक्यात हे वाक्य पक्कं बसलं. अन् हे गाणं कागदावर उतरलं. पुढे ते प्रचंड लोकप्रिय झालं आणि गायकवाड यांना ओळखही मिळाली.

आजच माझा झालाय पगार
देईन रोख नको उधार
गोष्ट पटली, झटकन उठली
अशी प्रथा मी गाजवली,
अहो रात्री या आंटीची
जेव्हा घंटी मी वाजवली…

सुक्ष्म निरीक्षण, प्रासंगिक गीते

गाणं कसं सूचतं आणि कसं लिहिलं जातं, यावर मानवेल गायकवाड त्यांचा अनुभव सांगतात. मी लिहायचं म्हणून लिहीत नाही. माझ्या गाण्यात जीवनानुभव असतो. कित्येकदा मी प्रासंगिक गीते लिहितो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचे सुक्ष्म निरीक्षण त्याला गाण्याचा विषय बनवतो. माझ्या गाण्यात गोष्ट असते. गंमत असते अन् त्याही पलिकडे जाऊन सांगायचं म्हणजे ऐकणाऱ्याला ते गाणं म्हणजे त्याचा अनुभव वाटतो. त्याने हा अनुभव एक तर घेतलेला असतो, पाहिलेला असतो किंवा ऐकलेला असता. थोडक्यात सांगायचं म्हणजे वास्तवाचं दिग्दर्शन म्हणजे माझं गाणं, असं मानवेल गायकवाड सांगतात.

गाण्यासाठी नोकरी सोडली

गायक, गीतकार प्रभाकर पोखरीकर यांच्याप्रमाणेच मानवेल गायकवाड यांनी गाण्यासाठी नोकरी सोडली. ते रेल्वेत नोकरीला होते. पण गाण्याचे कार्यक्रम आणि नोकरी दोन्ही सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यातच कामावर उशिरा गेल्यावर अधिकारी वर्ग फैलावर घ्यायचा. त्यामुळे त्यांनी अखेर वैतागून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना त्यांना सारासार विचार केला. कारण अनेक कलावंतांची झालेली वाताहत त्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्यांनी सर्व विचार करून धाडसी निर्णय घेतला आणि नंतर संगीत, गायन आणि गीत लेखन यावरच भर दिला. त्यातूनच त्यांनी त्यांच्या आर्थिक विवंचनेवर मात केली.

दरवर्षी मानधनात पाचशे रुपये वाढ

गायकवाड यांनी पाच हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. त्यांची गाणी सिनेमातही गायली गेली आहेत. प्रत्येक वर्षी त्यांचं एक तरी गाणं हिट होतंच आणि दरवर्षी ते मानधनात पाचशे रुपये वाढवतातच. इतर गाण्यासाठी ते कमी जास्त मानधन घेतात. पण लोकगीतांसाठी ते अजिबात कॉम्प्रमाईज करत नाहीत. त्यामुळेच त्यांना आंबेडकरी कलावंतांमधील महागडा गीतकारही म्हटलं जातं.

मिलिंद शिंदे आवडता गायक

मानवेल गायकवाड यांचे आवडते गायक मिलिंद शिंदे आहेत. मिलिंद शिंदे यांचं गाणं ऐकायला आवडतं असं ते सांगतात. मिलिंद यांचा आवाज गोड आणि सुरेल आहे. प्रल्हाद शिंदे आणि सुषमादेवी हे दोन गायकही अत्यंत सुरेल असल्याचं ते आवर्जुन सांगतात. (साभार, आंबेडकरी कलावंत) (read about manvel gaikwad’s famous song ‘antichi ghanti mi vajavali’)

संबंधित बातम्या:

‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो’, साहेबांच्या टोमण्यांमुळे नोकरीच सोडली; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

सोनू निगमला कोणत्या मराठी गायकाने पहिला ब्रेक दिला माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा

पहिलं गाणं रेकॉर्ड झालं अन् प्रल्हाद शिंदेंना सोन्याची अंगठी दिली; मधुकर घुसळेंचं ‘ते’ लोकप्रिय गाणं कोणतं?