‘खल्लास गर्ल’ ईशा कोपिकरचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर पतीपासून विभक्त

'खल्लास' या गाण्यातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री ईशा कोपिकर अधिकृतरित्या पती रोहित नारंगपासून विभक्त झाली आहे. घटस्फोटाच्या काही वर्षांआधीपासूनच ती वेगळी राहत होती. नऊ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ईशाने रोहितचं घर सोडलं होतं. आता याप्रकरणी रोहितने मौन सोडलं आहे.

खल्लास गर्ल ईशा कोपिकरचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर पतीपासून विभक्त
ईशा कोपिकरचा घटस्फोट
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2023 | 8:30 AM

मुंबई : 29 डिसेंबर 2023 | बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा कोपिकरने पती रोहित (टिम्मी) नारंगला घटस्फोट दिला आहे. 14 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात रोहित आणि ईशा औपचारिकरित्या विभक्त झाले. ईशाचा पती रोहित हा हॉटेलिअर आहे. घटस्फोटाच्या काही वर्षांपूर्वी ईशा तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला घेऊन वेगळी राहू लागली होती. रियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित नारंगने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. “ईशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे”, असं त्याने म्हटलंय.

ईशाने तिच्या घटस्फोटाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रोहित आणि ईशा यांच्यात बऱ्याच गोष्टींवरून पटत नसल्याने सतत भांडणं व्हायची, अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिली आहे. दोघांनी नात्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. अखेर ईशाने मुलीला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. ईशा आणि टिम्मी यांची पहिली ओळख एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट करण्यापूर्वी दोघं तीन वर्षांपर्यंत चांगले मित्र होते.

नोव्हेंबर 2009 मध्ये ईशा आणि राहुलने लग्न केलं. त्यानंतर जुलै 2014 मध्ये ईशाने मुलगी रियानाला जन्म दिला. 2002 मध्ये ‘कंपनी’ या चित्रपटातील ‘खल्लास’ या गाण्यामुळे ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘डरना मना है’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘हम तुम’, ‘क्या कुल है हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ईशा आणि रोहित हे अधिकृतरित्या विभक्त झाले असले तरी अद्याप इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने तिच्या नावापुढील नारंग हे आडनाव काढलेलं नाही. “मी सध्या याबद्दल बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा”, अशी विनंती तिने केली आहे.