“मी नशिबवान, अशा पुरुषांपासून..”; घटस्फोटाबाबत संजीदा शेखरने सोडलं मौन

अभिनेत्री संजिदा शेख आणि आमिर अली यांनी लग्नाच्या नऊ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांना चार वर्षांची मुलगी आहे. घटस्फोटानंतर संजिदा तिच्या मुलीचं संगोपन करतेय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजिदा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

मी नशिबवान, अशा पुरुषांपासून..; घटस्फोटाबाबत संजीदा शेखरने सोडलं मौन
संजीदा शेख, आमिर अली
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 15, 2025 | 3:35 PM

‘हिरामंडी’ या वेब सीरिजमधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री संजीदा शेखर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली. नऊ वर्षांच्या संसारानंतर संजीदाने पती आमिर अली घटस्फोट दिला. या दोघांना चार वर्षांची आयरा नावाची मुलगी आहे. याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये आमिर त्याच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. मात्र संजीदाने याबाबत मौन बाळगलं होतं. आता पहिल्यांदाच तिने याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. घटस्फोटानंतर ‘सिंगल मदर’ (एकल मातृत्व) म्हणण्यावरही तिने आक्षेप घेतला आहे. “सिंगल मदर हा काय प्रकार असतो? आई ही आईच असते”, असं ती म्हणाली.

“मी प्रत्येकाला हेच सांगते की आई ही आईच असते. मग ती सिंगल असो किंवा नसो.. याने काही फरक पडत नाही. आई म्हणून माझ्या जबाबदाऱ्या बदलणार नाहीत. मला माझ्या मुलीसाठी जे काही करायचं आहे, ते मी करेन”, असं संजीदा पुढे म्हणाली. संजीदा आणि आमिरने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. या घटस्फोटाविषयी तिने सांगितलं, “माझ्यासोबत जे काही घडलं त्यातून मला बाहेर पडता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. त्यावेळी मला असं वाटलं होतं की मीच सर्वांत नैराश्यग्रस्त व्यक्ती आहे किंवा मीच फार दु:खी आहे. माझ्यासोबत हे सर्व काय घडतंय? माझ्या आयुष्यासोबत हे काय झालं? पण त्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडता आल्याने आणि स्वत:वर पुन्हा प्रेम करता आल्याने मी नशिबवान समजते.”

आयुष्यात पुढे जात असताना पुन्हा प्रेम मिळेल का, याची प्रतीक्षा करत नसल्याचं संजीदाने स्पष्ट केलं. मात्र तुम्हाला प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती आयुष्यात असली तर त्यापेक्षा सुंदर काहीच नाही, असंही ती म्हणाली. “असे काही पुरुष असतात, असे काही पार्टनर्स असतात जे तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काहीच करू शकत नाही, असं ते तुम्हाला सांगतात किंवा ते म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार नाही. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं चांगलं असतं. प्रत्येक नात्यात अशी एक वेळ येते जेव्हा तुम्ही खुश असता किंवा जेव्हा तुम्ही खुश नसता. कधी कधी तुम्ही तुमच्या आयुष्यातील तो मोठा निर्णय घेता आणि तोच निर्णय मी माझ्यासाठी घेतला आहे. कारण मी स्वत:वर प्रेम करायला सुरुवात केली आहे. मी स्वत:ला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे”, अशा शब्दांत संजीदा व्यक्त झाली.