Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांना विचारला प्रश्न, तुम्हीच मला सांगा… पोस्ट व्हायरल
Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट पोलिसांनाच प्रश्न विचारला आहे. आता तुम्हीच मला सांगा... असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

हिरा ढाकणे, प्रतिनिधी: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील आगामी शोवरुन कुणाल याने मुंबई पोलिसांना पुन्हा घेरलं आहे… ‘मी मुंबईत शो पुन्हा करु शकतो?’ असा थेट सवाल त्याने मुंबई पोलिसांना केला आहे. सोशल मीडिया एक्सवर कुणाल याने पोस्ट केली आहे. सध्या त्याची पोस्ट चर्चेत असून अनेकांनी पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पोस्ट करत कुणाल म्हणतो, ‘जे लोक मला सतत विचारतात की मी मुंबईत पुढचा कार्यक्रम कधी करणार आहे, त्यांना सांगू इच्छितो की हाच प्रश्न मला देखील @Mumbai Police (मुंबई पोलिसां)ना विचारायचा आहे. मनोरंजनाच्या या राजधानीत मी माझा ‘स्टँड-अप’ कार्यक्रम कधी करू शकेन?
‘मला याची जाणीव आहे की माझ्या आधीच्या कामांमुळे गेल्या काही वर्षांत प्रशासकीय पातळीवर काहीशी खळबळ उडाली आहे. तसेच, मुंबई पोलिसांवर अनेक महत्त्वाची जबाबदारी आहे हेही मी मान्य करतो, जसं की कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्थापन, ‘इंडियाज गॉट लेटंट’ (India’s Got Latent) पाहणे आणि अधूनमधून, एखाद्या बंदिस्त खोलीत मला विनोद सांगण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवणं.’
For all who keep asking when I will be performing in Mumbai next: I have that same question for @MumbaiPolice. When can I perform my stand up in the entertainment capital?
I understand that my previous work has caused some amount of administrative excitement over the years. I…
— Kunal Kamra (@kunalkamra88) September 6, 2026
पुढे कुणाल म्हणतो, ‘त्यामुळे, मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की माझा नियोजित कार्यक्रम नेहमीप्रमाणे शांततेत, बंदिस्त जागेत, संमती असलेल्या 100 प्रौढ प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि सर्व लागू कायदे व नियमांचे पालन करूनच पार पडेल. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की, जर 40 – 50 विनोद न समजणारे किंवा विनोदाची समज नसलेले लोक कार्यक्रम रद्द करण्यासाठी, त्यात व्यत्यय आणण्यासाठी किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणाचं नुकसान करण्यासाठी आले, तर तुम्ही त्या उपद्रवी लोकांना त्यांचा ‘व्हेटो’ (अधिकार) वापरू द्याल का? ज्यांनी माझा कार्यक्रम पाहण्यासाठी तिकीटच काढलं नाही, अशा लोकांचा जमाव ‘स्वातंत्र्य’ कशाला म्हणतात हे ठरवणार का? खरं तर, प्रश्न फक्त एकाच गोष्टीचा आहे. तुम्ही जमावाच्या बाजूने आहात की कायद्याच्या?, सध्या कुणाल याची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.