मी आत्मा विकला, पण पॉर्नोग्राफी केली नाही..; ‘सी ग्रेड’ भूमिकांबद्दल ‘गोलमाल’ फेम अभिनेत्रीचा खुलासा
'गोलमाल' फेम अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांनी करिअरमध्ये काही वाईट चित्रपट का निवडले, यामागचं कारण सांगितलं आहे. यावेळी त्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

‘गोलमाल’, ‘खलनायक’, ‘किंग अंकल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चाहत्याच्या एका प्रश्नाचं उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे दिलं आहे. ‘तुम्ही काही वाईट चित्रपटांमध्ये काम का केलात’, असा सवाल एकाने विचारला असता, त्यांनी त्यामागील खरं कारण सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाबद्दल मनमोकळेपणे सांगितलं आहे. हा तो काळ होता, जेव्हा त्यांची प्रॉडक्शन कंपनी दिवाळखोर झाली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर 1 कोटी रुपयांचं कर्ज होतं. व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, “एकाने मला विचारलं, मॅडम तुम्ही वाईट चित्रपटांमध्ये काम का केलं? हे ऐकून मला धक्काच बसला.”
“आत्मा विकला पण पॉर्नोग्राफी केली नाही..”
“माझ्या आयुष्यातील तो काळ आठवून मला खूप अस्वस्थ वाटतं आणि प्रश्न पडतो की मी स्त्रियांचा अपमान करणाऱ्या अशा सी-ग्रेड चित्रपटांमध्ये का काम केलं? मी चांगल्या चित्रपटांमध्येही काम केलं. अर्थात काही भूमिका खूपच वाईट होत्या, पण मी पॉर्नोग्राफीमध्ये काम केलं नाही. देवाचे आभार की मी फक्त वाईट चित्रपटच निवडले. मी ते केलं आणि त्यासाठी मी माझा आत्मा विकला का? हो. मला त्याबद्दल चांगलं वाटतं का? तेव्हाही चांगलं वाटत नव्हतं आणि आजही अजिबात चांगलं वाटत नाही. पण परिस्थितीसमोर मी हतबल होते”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
पहा व्हिडीओ-
एक कोटी रुपयांचं कर्ज
ही परिस्थिती नेमकी काय होती, याबद्दल त्यांनी पुढे सांगितलं, “2002 मध्ये मी आणि माझ्या पतीने आमची मीडिया कंपनी गमावली. त्यानंतर आमच्यावर एक कोटी रुपयांचं कर्ज होतं. आमच्यासोबत ट्रॅक सिनेमा, अनिल चौधरी प्रॉडक्शन्स.. आम्ही सर्व दिवाळखोर झालो. कारण त्यावेळी तंत्रज्ञानाचं नवीन युग आलं होतं. आम्हाला त्यातलं काहीच कळत नव्हतं. त्यामुळे साहजिकच आमची कंपनी बुडाली. कर्जदार आमच्या दारात यायचे, वसुली एजंट शिवीगाळ करायचे. तो खूप कठीण काळ होता. माझी मुलं लहान होती. त्यामुळे मिळेल ते काम मी स्वीकारत गेले. त्यातून मला कर्ज फेडायचं होतं. त्यासाठी मी आणि माझ्या पतीने 3-4 वर्षे खूप मेहनत केली. म्हणूनच मला ते सर्व काम करावं लागलं. मला तसे निर्णय घ्यावे लागले.”
मुलांच्या शिक्षणासाठी तडजोड
“त्यातच माझ्यातली बंगाली आई जागृत झाली आणि मी माझ्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं. माझी मुलगी अभ्यासात हुशार होती, म्हणून मी हा निर्णय घेतला होता. त्यांच्या शिक्षणासाठी मला आणखी पैसे कमवावे लागले. अर्थात मला अजिबात पश्चात्ताप नाही. मी त्यांना चांगलं शिकवलं आणि ते आता स्वत:च्या पायावर उभे आहेत. पैसा कमावण्यामागे प्रत्येक व्यक्ती स्वत:ची वेगळी कारणं असतात. पण आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे मला आता तडजोड करण्याची गरज वाटत नाही. आम्ही कलाकार आहोत, आमच्याकडे नेहमीच पर्याय नसतात. खूप मोठ्या यंत्रणेतील आम्ही एक लहान भाग आहोत. कधीकधी घर चालवण्यासाठी आम्हाला मनाविरुद्ध काम करावं लागतं”, असं सुष्मिता या व्हिडीओच्या शेवटी म्हणाल्या.