मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकांचे भावविश्व, आणि नात्यातील गुंतागुंत यांचे सुरेख चित्रण दाखवले जात आहे. यात आता संजनाच्या लहान मुलाला अर्थात निखिलला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधताना संजना आणि इतरांची होणारी दमछाक दिसत आहे. तर, दुसरीकडे अनिरुद्धप्रमाणेच संजनावर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. मात्र, या सगळ्यात तिच्या नोकरीकडे तिचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आता तिला देखील बेरोजगारीचा फटका सोसावा लागणार आहे.
यशच्या एका मित्राच्या शॉर्ट फिल्मसाठी अरुंधतीला गाणं गाण्याची संधी मिळणार आहे. केवळ संधीच नाही तर यामुळे अरुंधतीच्या हातात तिचा पहिला-वाहिला पगार देखील येणार आहे. या गाण्यातून मिळालेले मानधन अर्थात पहिला पगार अरुंधती अप्पा आणि आईच्या हातात देणार आहे. गाण्याच्या संधी व्यतिरिक्त अरुंधतीला एक नवी नोकरी देखील मिळाली आहे.
अरुंधतीचा पहिला पगार आणि त्याच्या सेलिब्रेशनचा माहोल असतानाच, आता संजनाची नोकरी मात्र गेल्यात जमा होणार आहे. घरात पार्टीची चर्चा सुरु असतानाच संजना कामावरून घरी परतते. इतक्यात अनिरुद्ध तिला तुझं प्रेझेन्टेशन नक्कीच चांगलं झालं असणार असं म्हणतो. तेव्हा चेहरा पाडून संजना त्याला आपली नोकरी धोक्यात असल्याचे सांगते. माझ्या लॅपटॉपमधून प्रेझेन्टेशन डिलीट झाल्याने मेहताने मला देखील दोन महिने घरी बसण्यास सांगितले आहे, असे संजना म्हणते. तर, सकाळी निखिल अभ्यास करत असताना तूच माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी केलं होतंस, अर्थात अरुंधतीनेच ते प्रेझेन्टेशन डिलीट केल्याचा आरोप संजना करणार आहे.
संजना आणि शेखर यांचा मुलगा निखिल आईला भेटायला देशमुखांच्या घरात आला आहे. याचवेळी घरात गोकुळाष्टमी निमित्ताने ‘कृष्ण जन्म’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या पूजेला संजना आणि अनिरुद्ध जोडीने बसले होते. यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या लहानग्या निखिलला प्रश्न पडला होता की, अनिरुद्ध काकांबरोबर आपली आई का पूजेला बसलीय? हा प्रश्न विचारत तो अरुंधतीला अनिरुद्धसोबत पुजेस बसण्यास सांगतो. अर्थात घडल्या प्रकारची त्याला काहीच कल्पना नाहीय.
यानंतर आता लहानग्या निखिलला आणखी अनेक प्रश्न पडले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?’. निखिलला वाटते आहे की, अरुंधती प्रमाणेच शेखरने देखील त्यांच्यासोबत राहिले पाहिजे आणि आता त्याला असेच आणखी काही प्रश्न पडलेयत आणि पडणार आहेत. यामुळे आता त्याला उत्तरं कशी द्यायची हा मोठा प्रश्न संजना आणि अनिरुद्ध समोर उभा राहणार आहे.
‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात, दाढी-पगडीमध्ये स्पॉट झाला आमिर खान! पाहा खास लूक…
रणवीर सिंह-दीपिका पदुकोणची अलिबागमध्ये महागडी शॉपिंग! खरेदी केली तब्बल 90 गुंठे जागा!