मुंबई : भारतीय वायूसेनेने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला. भारतीय वायूसेनेने केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती. आता या घटनेवर सिनेमा बनवला जाणार आहे.
अनेक प्रॉडक्शन हाऊसला वायूसेनेच्या या कारवाईवर सिनेमा बनवायचा आहे. यासाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. अनेक प्रॉडक्शन हाऊस टायटल रजिस्ट्रेशनसाठी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशनच्या (आयएमएमपीए) दिशेने धाव घेत आहेत. आज एकूण पाच प्रॉडक्शन हाऊस टायटल रजिस्ट्रेशनसाठी आयएमएमपीएकडे गेले होते.
एअर स्ट्राईकवर सिनेमा बनवण्यासाठी प्रॉडक्शन हाऊस वेगवेगळ्या नावांची नोंदणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये पुलवामाः द टेरर अटॅक, पुलवामा अटॅक व्हर्सेस सर्जिकल स्ट्राईक्स 2.0, सर्जिकल स्ट्राईक 2.0, बालाकोट अशा नावांचा समावेश आहे. तर याशिवाय अनेक प्रॉडक्शन हाऊसने अगोदरच नावाची नोंदणी केलेली आहे. यामध्ये वॉर रूम, हिंदुस्तान हमारा है, पुलवामा टेरर अटॅक, द अटॅक्स ऑफ पुलवामा, विथ लव फ्रॉम इंडिया आणि एटीएस- वन मॅन शो या नावांचा समैवेश आहे.
याआधी भारतीय लष्कराने 2016 साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा बनवण्यात आला. यामध्ये अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमाने आतापर्यंत 200 कोटीहून अधिकचा गल्ला जमवला आहे.
भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा सिनेमा आहे.