Maharashtra Swine Flu News : स्वाईन फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू! मुंबईत रुग्णांची संख्या सर्वाधिक

| Updated on: Jul 23, 2022 | 9:45 AM

कोरोनाचे संकट आत्ता कुठे कमी होत असतानाच स्वाईन फ्लू ने (Swine Flu)पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक (43) असून महाराष्ट्रात आत्तापर्यंत 7 रुग्णांनी जीव गमावला आहे.

Maharashtra Swine Flu News : स्वाईन फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू! मुंबईत रुग्णांची संख्या सर्वाधिक
स्वाईन फ्लूची चाचणी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर विनामूल्य होणार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कोरोनाचे संकट आत्ता कुठे कमी होत असतानाच स्वाईन फ्लूने (Swine Flu)पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. . महाराष्ट्रात (Maharashtra) स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून मुंबईत (Maximum cases in Mumbai) रुग्णांची संख्या सर्वाधिक (43) आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे एकूण 142 रुग्ण सापडले आहेत. गेल्या तीन वर्षांत मुंबईत H1N1 विषाणू (स्वाईन फ्लू) मुळे एकही मृत्यू झालेल नाही, मात्र 2022 या वर्षांत मुंबईत रुग्णांची संख्या सर्वात अधिक, 43 इतकी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या डेटामधून समोर आले आहे. 1 जानेवारी 2022 ते 21 जुलै 2022 या कालावधीतील आढळलेल्या रुग्णांची माहिती समोर आली असून राज्यात 142 रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 43 रुग्ण, पुण्यात 23 (मृत्यू 2), पालघर 22, नाशिक 17, नागपूर 14, कोल्हापूर 14 ( मृत्यू 3), ठाण्यात 7 ( मृत्यू 2) आणि कल्याण – डोंबिवलीत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण सापडले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक योजना अमलात आणल्या जात आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

स्वाईन फ्लू म्हणजे काय?

स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून H1N1 व्हायरसमुळे त्याची लागण होते. 2009 साली WHO ने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते. हा आजार केवळ माणसांमुळे नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाली असेल , तो शिंकला अथवा खोकला, तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात. याचे विषाणू हवेत 8 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. ह्या विषाणूंचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे, नाक, तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला, तर विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन फ्लूची लागण होते.

काय आहेत स्वाईन फ्लूची लक्षणे?

स्वाईन फ्लूची लक्षणे सामान्य तापासारखीच असतात. खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे.

हे सुद्धा वाचा
  • – ताप येणे, हुडहुडी भरणे वा थंड वाजणे.
  • – सर्दी होऊन नाक वाहते राहणे.
  • – खोकला, घशात खवखव वा दुखणे
  • – अंगदुखी तसेच डोके दुखणे
  • – पोटात दुखणे
  • – मळमळ वा उलटी होणे, यासाखी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसू शकतात.

65 वर्षांवरील नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला, तसेच मधुमेह , किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्लूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

काय काळजी घ्याल ?

आपले हात वारंवार साबण अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. तोंडावर मास्क वापरावा. खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. खोकला अथवा शिंक आल्यास, त्यानंतर त्वरित हात स्वच्छ धुवावेत. सर्दी-खोकला झाला असल्यास बाहेर, गर्दीच्या ठिकाणी न जाता घरीच थांबावे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत, अंगावर दुखणे काढू नये. स्वाईन फ्लूची लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. पूर्ण बेडरेस्ट घ्या. औषधांचा कोर्स पूर्ण करा, उपचार मध्येच सोडू नका. शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी अथवा फळांचा रस प्या. योग्य काळजी घ्या.