
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी, दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर चालवलं होतं. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनात पकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रेटून खोट बोलत आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताविरुद्ध विजय मिळवल्याचा दावा केला. पाकचं रडगाणं पाहून भारताने त्यांना थेट प्रत्युत्तर देत पाकचा खोटेपणाचा बुरखा फाडला. शरीफ यांच्या भाषणावर बोलताना भारतीय राजदूत पेटल गेहलोत म्हणाल्या की, आज सकाळी या सभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नाटक केले, त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला.
पण कोणतंही, कितीही नाटक केलं, खोटेपणा केला तरी तथ्य, सत्य सपवलं जाऊ शकत नाही, असं त्या म्हणाल्या. हा तोच पाकिस्तान आहे ज्याने 25 एप्रिल 2025 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, जम्मू आणि काश्मीरमधील पहलाम येथील पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडाच्या जबाबदारीपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंटचे रक्षण केले.दहशतवाद पसरवण्याच्या आणि निर्यात करण्याच्या परंपरेत दीर्घकाळ बुडालेल्या देशाला या उद्देशासाठी सर्वात हास्यास्पद कथा रचण्यास काहीच लाज वाचत नाही, असे तिखट बोल गेहलोत यांनी सुनावले.
पाकिस्तानी सैन्याकडून युद्ध थांबवण्याची विनंती
त्यांनी (पाकिस्तान) ओसामा बिन लादेनला दशकभर आश्रय दिला होता हे लक्षात ठेवलं पाहिज. एकीकडे ते दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भागीदार असल्याचे भासवतात, पण अलीकडेच त्यांच्या मंत्र्यांनी कबूल केलं की ते दशकांपासून दहशतवादी छावण्या चालवत आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या पातळीवर हा ढोंगीपणा, दुटप्पीपण पुन्हा एकदा सुरू झालाय, यात काहीच आश्चर्य वाटायला नको असंही गेहलोत म्हणाल्या.
एक फोटो हा हजारो शब्दांच्या बरोबरीचा असतो. आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सेनेने बहावलपुर आणि मुरीदके येथे मारलेल्या दहशतवाद्यांचे अनेक फोटो आपण पाहिले. जेव्हा वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी अशा कुख्यात दहशतवाद्यांचा जाहीरपणे गौरव करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात. पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षाबद्दल एक विचित्र माहिती दिली. या बाबतीत रेकॉर्ड स्पष्ट आहे. जो पाकिस्तान 9 मे पर्यंत भारतावर आणखी हल्ले करण्याची धमकी देत होता, त्याच पाकिस्तानी सैन्याने 10 मे रोजी आम्हाला थेट ही लढाई थांबवण्याचे आवाहन केले होते, असे त्यांनी नमूद केलं.
द्वेष पसवरणारा सांगतोय आस्थेचे महत्व
भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले. त्या नुकसानाचे फोटो सर्वज्ञात आहेत आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. जर उद्ध्वस्त धावपट्टी आणि जळालेले हँगर विजयाचे प्रतीक असतील तर पंतप्रधान शरीफ त्याचा आनंद घेऊ शकतात असा टोला गेहलोत यांनी लगावला. सत्य हे आहे की, भूतकाळात जे घडलं, त्याप्रमाणेच भारताचील निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्ही आमच्या लोकांचे रक्षण करण्याचा आमचा अधिकार बजावला आहे असं त्यांनी सांगितलं.
“पाकिस्तानी पंतप्रधान हे भारतासोबत शांततेबद्दल बोलले आहेत. जर ते खरोखरच प्रामाणिक असतील तर मार्ग मोकळा आहे. पाकिस्तानने सर्व दहशतवादी छावण्या ताबडतोब बंद कराव्यात आणि भारतात हवे असलेले दहशतवाद्यांना त्यांच्या स्वाधीन करावे.” असं गेहलोत म्हणाल्या. ” द्वेष, कट्टरता आणि असहिष्णुता बाळगणारा देश, या मेळाव्यात श्रद्धेच्या बाबींवर उपदेश करत आहे हे खरोखरंच विडंबनात्मक आहे. पाकिस्तानचे राजकीय आणि सार्वजनिक भाषण त्याचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. त्यांनी आरशात पाहण्याची वेळ आता निघून गेली आहे हे तर आता जाहीर आहे ” अशा शब्दांत त्यांनी पाकला खडेबोल सुनावले.
भारताने जगाला स्पष्ट मेसेज
पेटल म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तान यांनी बऱ्याच काळापासून सहमती दर्शवली की, त्यांच्यातील कोणतेही प्रलंबित प्रश्न द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जातील. या संदर्भात कोणत्याही तिसऱ्या पक्षाला जागा नाही. हा आमचा दीर्घकालीन राष्ट्रीय निर्णय आहे. दहशतवादाच्या बाबतीत, आम्ही हे स्पष्ट करत आहोत की दहशतवादी आणि त्यांचे प्रायोजक यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही. दोघांनाही जबाबदार धरले जाईल आणि आम्ही अणुहल्ल्याच्या ब्लॅकमेलच्या नावाखाली दहशतवाद वाढू देणार नाही. भारत अशा धमक्यांपुढे झुकणार नाही. जगासाठी भारताचा स्पष्ट संदेश आहे : दहशतवाद बिलकूल सहन करू नये.
काय म्हणाले होते शहबाज शरीफ?
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जुनं रडगाणं गात भारतावर आरोप केले की, भारताने पाकिस्तानच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला केला, आपल्या सशस्त्र दलांना प्रत्युत्तर द्यावे लागले. त्यांनी सिंधू पाणी कराराच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला आणि भारताने करारातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा एकतर्फी आणि बेकायदेशीर प्रयत्न केवळ कराराच्या तरतुदींचे उल्लंघन करत नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमांचेही उल्लंघन करतो असे शरीफ म्हणाले होते.