मालदीवची अक्कल आली ठिकाण्यावर, चीन दौऱ्यात भारताबाबत महत्त्वाचे वक्तव्य

भारत आणि मालदीवचे संबंध मुइज्जू सरकारमध्ये आल्यापासून बिघडले आहेत. इंडिया आउटचा नारा देऊन त्यांनी निवडणूक जिंकली होती. सत्तेत आल्यापासून ते भारतविरोधी वक्तव्य करत होते. पण आता याचा त्यांनाच मोठा फटका बसल्याने मालदीवचे मंत्री भारताबाबत सकारात्मक बोलू लागले आहेत.

मालदीवची अक्कल आली ठिकाण्यावर, चीन दौऱ्यात भारताबाबत महत्त्वाचे वक्तव्य
shailesh musale | Updated on: Jun 27, 2024 | 8:03 PM

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध गेल्या काही महिन्यात बिघडले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. भारताने मालदीव सोबत संबंध सामान्य ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. पण मालदीवचे अध्यक्ष हे चीन समर्थक असल्याने ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत. या दोन्ही देशांमधील तणावाचा सर्वाधिक फटका मालदीवलाच बसला आहे. भारतातून तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झालीये. दर महिन्याला भारतीय पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय. आता या धक्क्यानंतर मालदीव शुद्धीवर आले आहे. मोहम्मद मुइज्जूचे मंत्री चीनच्या दौऱ्यावर आहेत, जिथे ते भारताचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

चीनच्या दौऱ्यात भारताचे कौतूक

मालदीवचे मंत्री मोहम्मद सईद हे पहिल्या चीन दौऱ्यावर आहेत, त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यावर भाष्य केले. आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या भारत भेटीनंतर माले यांनी नवी दिल्लीशी संबंध पुन्हा प्रस्थापित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुइज्जू ९ जून रोजी भारतात आले होते.

“अध्यक्ष मुइज्जू यांनी पुनरुच्चार केला आहे की भारत आमचा सर्वात जवळचा शेजारी आहे,” मोहम्मद सईद हे डालियानमधील 15 व्या जागतिक आर्थिक मंच (WEF) मध्ये उपस्थित आहेत, त्यांनी CNBC इंटरनॅशनल टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि मालदीव ‘तणाव’ या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, भारत आणि मालदीव यांच्यात दीर्घकाळापासून चांगले संबंध आहेत. विशेषत: भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने भारत हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मालदीवमध्ये विशेषत: पर्यटन क्षेत्रात भारताची मोठी गुंतवणूक आहे.

भारत भेटीनंतर काय म्हणाले मुइज्जू

नवी दिल्लीहून माले येथे परतल्यावर, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या अधिकृत भारत भेटीचे वर्णन मालदीवसाठी एक महत्त्वपूर्ण यश आहे. दोन्ही देशांमधील मजबूत संबंध मालदीव आणि मालदीवच्या नागरिकांमध्ये समृद्धी आणतील यावरही मुइज्जू यांनी भर दिला होता. चीनला भेट देणारे सईद हे मालदीवचे पहिले मंत्री आहेत. याआधी जानेवारीमध्ये मुइज्जू यांनी बीजिंगला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान 20 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, ज्यामध्ये पर्यटन क्षेत्रासह इतर अनेक मुद्द्यांचा समावेश होता.

Follow Us