भयानक… कधीही न पाहिलेलं दृश्य! नेपाळमधून भारतात वाहून येत आहेत मृतदेह… आणखी काय वाहून आलं?
नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुराने अतोनात विध्वंस घडवला आहे. यात ६२६ जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेपत्ता आहेत. भारत, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांचे नागरिकही हरवले आहेत. पुरामुळे वाहून आलेले मृतदेह भारतात, विशेषतः उत्तर प्रदेशातील गंडक नदीत आढळल्याने चिंता वाढली आहे.

नेपाळच्या भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे अति भयानक विध्वंस घडवून आणला आहे. मानवतेला हादरवून सोडणारा असा हा महाभयानक विध्वंस आहे. या जलप्रलयात 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि चीनसहीत अनेक देशांचे नागरिक अद्यापही सापडत नाहीयेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. जे लोक बेपत्ता झाले आहेत, त्यांच्या बाबतचे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेपाळमधील नद्यांमधून प्रेते वाहून जात आहेत. भारतात ही प्रेते वाहून येत असल्याने खळबळ उडाली आहे. कधीच पाहिलं नाही असं दृश्य पाहायला मिळताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील गंडक नदीत तीन मृतदेह वाहून आले आहेत. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही मृतदेह नेपाळमधून वाहत आले आहेत. अधिकाऱ्यांनीही त्याची पुष्टी केली आहे. हे तिन्ही मृतदेह बॅराज पियर 3 येथे मिळाले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. कुशीनगरच्या खड्डा एरियात हे मृतदेह आढळले. खड्डा विभागाचे एसएचओ संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉनिटरिंग टीमला हे मृतदेह वाहत असल्याचं दिसलं. त्यामुळे तात्काळ बाहेर काढण्यात आले. त्याची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली.
गॅस सिलिंडर आणि गाड्याही…
या मृतदेहांची ओळख पटावी म्हणून त्याची माहिती नेपाळला देण्यात आली आहे. मात्र, या मृतदेहांची तात्काळ ओळख पटू शकलेली नाही. मृतदेहच नाही तर गंडक नदीत सिलेंडर, गाड्या, घरातील महत्त्वाच्या वस्तू व इतर सामान वाहून भारतात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
एकाच कुटुंबातील 40 जण बेपत्ता
नेपाळमध्ये एका कुटुंबातील 40 लोक बेपत्ता झाले आहेत. या कुटुंबातील संबंधित एका व्यक्तीने मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आमच्या कुटुंबातील एकूण 40 लोक बेपत्ता आहेत. मी एकटाच उरलो आहे. कोणीच सापडत नाहीये. आता केवळ देवावरच विश्वास आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे, अजून काय म्हणणार? आम्ही खूप त्रस्त आहोत. पण आता करणार तरी काय? असा सवाल या व्यक्तीने केला आहे.
आम्ही धुंगे बाजार परिसरात राहतो. हा परिसर पुरात वाहून गेला आहे. आमच्या घरातील लोकांशी कोणताच संपर्क झालेला नाहीये, असं त्याने सांगितलं. नेपाळमध्ये आतापर्यंत 626 लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आतापर्यंत 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे.