कोकणात भीषण जंगलतोड, 1600 एकरातील हिरव्यागार निसर्गाची कत्तल

| Updated on: Jun 05, 2019 | 3:34 PM

धक्कादायक म्हणजे, कोकणातील सावंतवाडी-दोडामार्ग वाईल्डलाईफ कॉरिडोअरमध्ये 2014 सालानंतर जंगलतोड करण्यात आली.

कोकणात भीषण जंगलतोड, 1600 एकरातील हिरव्यागार निसर्गाची कत्तल
Follow us on

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत असताना, कोकणातून पर्यावरणाबाबत काहीशी निराशाजनक आणि दु:खद बातमी समोर आली आहे. कोकणातील सावंतवाडी-दोडामार्ग वाईल्डलाईफ कॉरिडोअरमधील तब्बल 1600 एकरातील झाडांची अक्षरश: कत्तल करुन, जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या कोकणच्या निसर्गाला जमीनदोस्त करण्यात आले आहे. ‘वनशक्ती’ या समाजसेवी संस्थेने कोकणात भीषण जंगलतोड झाल्याचे उघड केले आहे.

धक्कादायक म्हणजे, कोकणातील सावंतवाडी-दोडामार्ग वाईल्डलाईफ कॉरिडोअरमध्ये 2014 सालानंतर जंगलतोड करण्यात आली. 2013 सालीच मुंबई हायकोर्टाने याच भागातील 30 किलोमीटरच्या परिसात झाडं तोडण्यावर बंदी आणली होती. हा संपूर्ण परिसर कर्नाटकातील भीमागड अभयारण्य ते महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्याला जोडणारा आहे. या अभयारण्यात वाघ, हत्ती, रानगवा यांच्यासारखे प्राणी आहेत. त्यामुळे विविध जाती-प्रजातीच्या वनस्पती, विविध पशु-पक्षी असलेल्या या निसर्गसंपन्न परिसराची सौंदर्यता आणि संपन्नता ‘धुळीस’ मिळाली आहे.

2013 ते आतापर्यंत पश्चिम घाटावरील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील 103 जागांवर निसर्गाची कशी धुळधाण उडवली गेली आहे, हे ‘वनशक्ती’ या समाजवेसी संस्थेने गूगल मॅपच्या द्वारे दाखवून दिले आहे. वनशक्तीने प्रसिद्ध केलेल्या गूगल मॅपवरुन सहज लक्षात येते की, निसर्गसंपन्न हिरवीगार जमीन उजाड झाली आहे.

कोकणातील सावंतवाडी-दोडामार्ग वाईल्डलाईफ कॉरिडोअरमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करणं शक्य नाही, त्यामुळे आम्ही गूगल मॅपद्वारे तुलनात्मक निरीक्षण केलं, असे ‘वनशक्ती’चे सदस्य डी. स्टॅलिन यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

राजकीय नेते काय म्हणाले?

“जंगलतोड होते ते अतिशय गंभीर आहे. याची चौकशी झाली पाहिजे. कशासाठी हा वाइल्डलाइफ कॉरिडॉर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, रिपोर्ट मी वाचलेला नाही, पण नक्कीच त्याचा अभ्यास केला पाहिजे.” असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

तसेच, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खासगी वनावर अवैद्य वृक्षतोड होते. यासंदर्भात सरकारने गंभीरतेने कायदे कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कायदा बनवण्याचा दृष्टिकोनातून हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या एक-दोन महिन्यात नवीन कायदा तयार करत आहोत.”

दरम्यान, कोकणातल्या निसर्गाची चर्चा जगभर होत असते. मात्र, या निसर्गावरच आता हातोडा पडत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहेच. सोबत पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे.