परराज्यातील मजुरांसाठी आधीच ट्रेनचे नियोजन करा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

| Updated on: Apr 23, 2020 | 2:47 PM

रेल्वे सेवा सुरु झाल्यास महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची, आणि पर्यायाने गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली आहे (Ajit Pawar writes to Railway Minister for making arrangement of Trains for Migrant labors)

परराज्यातील मजुरांसाठी आधीच ट्रेनचे नियोजन करा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबई : लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर रेल्वे सेवा सुरु झाल्यास रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुण्याहून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात, आणि त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. (Ajit Pawar writes to Railway Minister for making arrangement of Trains for Migrant labors)

केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपत आहे. त्यानंतर रेल्वे सेवा सुरु झाल्यास महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची, आणि पर्यायाने गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असं लिहित अजित पवार यांनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांना केली आहे.

केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यापासून उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. राज्य सरकारतर्फे त्यांच्यासाठी शिबीर व्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हेही वाचा : परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

राज्य सरकारच्या शिबिरांमध्ये सध्या साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम, सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत. पहिल्या देशव्यापी लॉकडाऊन समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं.

रेल्वे मंत्रालयाने या वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे लागू लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी किंवा केंद्राने ठरवल्याप्रमाणे लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वे सेवा सुरु होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई आणि पुणे येथून विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास, या मजूरांना सुरक्षित घरी जाता येईल, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल, असं उपमुख्यमंत्री म्हणतात.

महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने, तसेच येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजूरांची संख्या देशात सर्वाधिक आहे. हे मजूर असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात. लॉकडाऊनमुळे दीड महिन्यांपासून ते शिबिरात आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. शिबिरांमध्ये निवास, भोजनाची, वैद्यकीय उपचारांची सोय सरकार आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली आहे. ती यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल. परंतु, जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत ते लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. या शक्यता गृहित धरुन रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


(Ajit Pawar writes to Railway Minister for making arrangement of Trains for Migrant labors)