मान्सूनचं महाराष्ट्रात जोरदार आगमन, अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सगळीकडेच चांगला पाऊस होताना दिसत आहे. चांगली सुरुवात होत असल्याने शेतकरी राजा देखील सुखावला आहे. अनेक ठिकाणी पेरणीच्या कामांची सुरुवात होणार आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना देखील दिलासा मिळत आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती जोरदार पावसाची. अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शहरी भागात देखील पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात धुंवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडासह पाऊस पडत आहे. मिरग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यासह देखील पावसाने जोरदार हजेरी लावलीये. गेल्या तासाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. घरात गुडघाभर पाणी साचल्यानं अनेकांची धावपळ झाली. पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी पाणी साठलं आहे.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. तर बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतीची मशागत सुरू असून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे.
नंदुरबार शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे. वेळेवर पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार शहरात आणि परिसरात होत असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. शहरात आणि परिसरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात सीमा लगत असलेल्या भागात जोरदार पाऊस होत आहे. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं कृषी विभागाने आवाहन केले आहे. आज आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांना काहीसा फायदा होणार आहे.