मनसेच्या मोर्चानंतर बांगलादेशींची धरपकड सुरु, विरारमधून 23 जणांना अटक

| Updated on: Feb 12, 2020 | 11:25 AM

मनसेच्या मोर्चानंतर आता बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरु झाली आहे. विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्य करणाऱ्या 23 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना धडक कारवाई करत अटक करण्यात आली आहे.

मनसेच्या मोर्चानंतर बांगलादेशींची धरपकड सुरु, विरारमधून 23 जणांना अटक
Follow us on

विरार/रत्नागिरी : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता (MNS Morcha). मनसेच्या मोर्चानंतर आता बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरु झाली आहे. विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्य करणाऱ्या 23 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना धडक कारवाई करत अटक करण्यात आली आहे (Bangladesh People Arrest).

अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून 23 बांगलादेशींना अटक केली आहे. सापळा कारवाई दरम्यान मंगळवारी मध्यरात्री या बांगलादेशींना अटक करण्यात आली. यामध्ये 10 महिला 12 पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या बांगलादेशींविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजपही आक्रमक

दुसरीकडे, मनसे पाठोपाठ बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजपही आक्रमक झाली आहे. रत्नागिरीत पर्यटन व्हिसा घेऊन आलेले बांगलादेशी लोकं आक्षेपार्ह गोष्टी करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. पर्यटन व्हिसाच्या नावावार 13 बांगलादेशी नागरिक रत्नागिरीत राजीवडा परिसरात वास्तव्याला असल्याचं भाजपने सांगितलं आहे.

पर्यटन व्हिसावर आलेले बांगलादेशी नागरिक जमाते तबलीकचे आहेत. ते धार्मिक प्रचार आणि भारत सरकारच्याविरोधात गैरसमज पसरवत असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन रत्नागिरी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलं आहे. तर, संबंधित व्यक्तींवर करडी नजर असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केला आहे.