कुरळ्या केसांची सीता.., ‘रामायणम्’मधील साई पल्लवीबद्दल दीपिका चिखलिया स्पष्टच बोलल्या..
'रामायणम्' या चित्रपटात प्रभू श्रीराम, सीता माता आणि रावण यांच्या भूमिकेसाठी निवडल्या गेलेल्या कलाकारांबद्दल अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहेत. साई पल्लवीबद्दल त्या काय म्हणाल्या, ते जाणून घ्या..

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर आज (24 जुलै) प्रदर्शित होणार होता, परंतु आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या चित्रपटाविषयी मोकळेपणे प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड आणि इतर कलाकारांविषयीही त्यांनी आपलं मत मांडलं आहे. ‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना दीपिका यांनी म्हटलंय की, त्यांनी साई पल्लवीचं काम पाहिलं आहे आणि ती उत्कृष्ट कलाकार आहे. परंतु सीतेच्या भूमिकेत ती किती योग्य असेल हे आताच सांगणं घाईचं ठरेल.
दीपिका म्हणाल्या, “मी तिचं काम पाहिलं आहे. ती अभिनेत्री म्हणून कमाल आहे. परंतु सीतेच्या भूमिकेत ती कशी दिसेल, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. आता मला त्याविषयी काहीच अंदाज नाही. तुलसीदास यांच्या रामायणात सीतेचं वर्णन आहे, त्यांचे डोळे, उंची, केस, रंग-रुप यांचं वर्णन त्यात वाचायला मिळतं. रामानंद सागर हे तशाच दिसणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होते आणि त्यांना माझ्यात ते दिसलं. चित्रपटातील इतरही कलाकार जर त्यांच्या भूमिकेत योग्य दिसत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मी यशचंही काम पाहिलं आहे. मला खात्री आहे की तो रावणाच्या भूमिकेत दमदार कामगिरी करेल. पण लोकांच्या हृदयातून जुनं रामायण पुसून टाकणं खूप कठीण आहे. जर हा चित्रपट 50 वर्षांनंतर आला असता, तर लोक कदाचित मूळ कलाकारांना विसरले असते. पण त्या आठवणी आजही ताज्या आहेत.”
दीपिका यांनी पुढे असंही सांगितलं की रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेचं आजही लोकांच्या मनात विशेष स्थान आहे. “रामायण या मालिकेचा प्रभाव चित्रपटात नक्कीच दिसून येईल. आजसुद्धा लोक माझ्या नावाने कमी आणि सीतेच्या नावाने अधिक ओळखतात. हीच माझी ओळख बनली आहे. कोरोनादरम्यान जेव्हा आमची मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली होती, तेव्हा नव्या पिढीनेही ती पाहिली. त्यामुळे लोकांच्या मनातून या मालिकेच्या आठवणी मिटणार नाहीत. जिथपर्यंत माझ्या लक्षात आहे, रामायणात कुठेच सीतेच्या कुरळ्या केसांचा उल्लेख नाही”, असंही त्या म्हणाल्या.
दीपिका यांनी स्पष्ट केलं की ‘सीता’ या भूमिकेतून मिळालेली प्रचंड लोकप्रियता त्यांच्यासाठी एक आव्हान बनलं होतं. “रामायण या मालिकेनंतर मला काहीच काम मिळालं नाही. आजही मी लोकांकडे काम मागते. बर्फी, संजू आणि अॅनिमलसारख्या चित्रपटात काम केल्यानंतर रणबीर कपूर आता प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. आजचा काळ खूप वेगळा आहे. आमच्या काळात अभिनेते एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून राहायचे. आजही लोकांना मला दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत कल्पना करणं कठीण वाटतं. म्हणूनच मी निर्मिती क्षेत्राकडे वळले”, असं त्यांनी सांगितलं.
