कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणे महाराष्ट्राला शोभत नाही- दरेकर

| Updated on: Oct 30, 2020 | 8:46 PM

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे 900 कोटीचे थकीत पगार आणि इतर व्यवस्थांसाठी दोन हजार कोटींचे कर्ज घेण्याचा मानस | Pravin Darekar

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणे महाराष्ट्राला शोभत नाही- दरेकर
Follow us on

मुंबई: कर्मचाऱ्यांचे थकित पगार देण्यासाठी एसटीच्या मालमत्ता गहाण ठेवणे, महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. एसटीसाठी जर कर्ज घ्यायचे असेल तर राज्य सरकारची कर्ज घेण्याची क्षमता आहे. राज्य सरकारने कर्ज घेऊन बाँड निर्माण करावेत व एसटीचा कारभार चालवावा. पण एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभारणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली. (ST corportion will take loan to paid employees salary)

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे 900 कोटीचे थकीत पगार आणि इतर व्यवस्थांसाठी दोन हजार कोटींचे कर्ज घेण्याचा मानस परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला होता. याबद्दल बोलताना दरेकर यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची नक्कीच आवश्यकता आहे. सध्या सरकारला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. उद्या मंत्रालयातील शासकीय कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे असेल तर तुम्ही मंत्रालय गहाण ठेवणार का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

राज्य सरकार म्हणून महामंडळांनी पैसे उभारण्यापेक्षा सरकारने पैसे उभे करून एसटीला आर्थिस आधार देण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराविषयी आग्रही भूमिका घेतल्यामुळेच एक महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आला. त्यांचे तीन महिन्याचे वेतन अदयापही द्यायचे आहेत. दिवाळी तोंडावर असल्यामुळे वेळेत पैसे उभे करणे गरजेचे आहे. पण कर्जाच्या माध्यमातून खाजगीकरणाचा तर डाव नाही ना? उद्या आपण मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केल्यास एसटी महामंडळ कर्जबाजारी होईल. कुणीतरी खासगी कंपनीने एसटी महामंडळ ताब्यात घ्यावे, असा हेतू तर नाही ना, अशी शंका प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखविली.

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधामुळे एसटीतून मर्यादित संख्येपर्यंतच प्रवासी वाहून नेण्याची मुभा होती. यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. तिकीटाच्या रक्कमेतून एसटीच्या इंधनाचाही खर्च निघत नव्हता. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला होता. एसटीचे उत्पन्नच बंद झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. याविषयी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे वेळोवेळी दाद मागितली. परंतु, अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

संबंधित बातम्या:

कामगारांचे तीन महिन्याचे पगार थकले; एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार: अनिल परब

दिवाळीला गावी जाताय? मग एसटीनेच जा!, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून हंगामी दरवाढ रद्द

(ST corportion will take loan to paid employees salary)