चंद्रपुरात आज जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद

| Updated on: May 28, 2019 | 7:11 PM

चंद्रपूर : विदर्भात उन्हाचा कहर सुरु आहे. नागपुरात गेल्या 15 वर्षातील दुसरं सर्वोच्च तापमान (47.5) आहे, तर चंद्रपूरचं तापमान 47.8 डिग्री सेल्सियस एवढे नोंदलं गेलंय. हे जगातील शहरात आजचं सर्वाधिक तापमान आहे. चंद्रपूरचंही यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक तापमान आहे. गेले काही दिवस चंद्रपूरचा पारा 46 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होता. आज त्याने उसळी घेत नव्या उच्चांकाची […]

चंद्रपुरात आज जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद
Follow us on

चंद्रपूर : विदर्भात उन्हाचा कहर सुरु आहे. नागपुरात गेल्या 15 वर्षातील दुसरं सर्वोच्च तापमान (47.5) आहे, तर चंद्रपूरचं तापमान 47.8 डिग्री सेल्सियस एवढे नोंदलं गेलंय. हे जगातील शहरात आजचं सर्वाधिक तापमान आहे. चंद्रपूरचंही यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक तापमान आहे. गेले काही दिवस चंद्रपूरचा पारा 46 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होता. आज त्याने उसळी घेत नव्या उच्चांकाची नोंद केली. पुढचे काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलाय. 2 जूनपर्यंत कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

निर्मनुष्य झालेले रस्ते, एसी वा कुलरच्या गारव्यानेही थंडावा मिळत नसल्याचे चित्र आणि स्वतःला थंड ठेवण्यासाठी नागरिकांनी विविध शीतपेयांचा घेतलेला आधार अशी सध्या चंद्रपूरकरांची स्थिती आहे. गेले काही दिवस चंद्रपूरचे तापमान 46 डिग्री सेल्सिअसच्यावर नोंदले गेले आहे. दोन दिवस आधी विदर्भाच्या या भागात उष्णतेची लाट जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार आज पाऱ्याने नवा उच्चांक गाठत यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली.

जगातील शहरात आजचं सर्वाधिक तापमान आहे. आजचे तापमान 47.8 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदले गेले असून यामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत. 2 जून 2007 रोजी चंद्रपूरच्या तापमानाने 49 डिग्री सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद केली होती. हे गेल्या काही दशकातील सर्वाधिक तापमान होतं. सध्या पुढचे काही दिवस चंद्रपूरकरांना उष्णतेच्या लाटेपासून मुक्तता नसल्याचं अभ्यासकांचं मत आहे. उष्णतेची ही लाट मान्सून रखडल्यास अधिक काळापर्यंत राहणार असल्याने सध्यातरी चंद्रपूरकरांना तापमानाच्या असहय्य चटक्यांपासून सुटका नसल्याचं स्पष्ट होत आहे.

केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात अशाच प्रकारच्या उष्णतेच्या लाटांमुळे कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. मान्सूनच्या आगमनापर्यंत नागरिकांची उष्णतेने दैना होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. तापमानाच्या बाबतीत भारताने आखाती देशांनाही मागे सोडलंय.