राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

| Updated on: May 04, 2020 | 9:02 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवण्याचे निर्देश दिले आहेत (CM Uddhav Thackeray on making maharashtra green zone).

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये काही प्रमाणात निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवण्याचे निर्देश दिले आहेत (CM Uddhav Thackeray on making maharashtra green zone). मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता देखील आणली. पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करुन आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरुप योग्य तो निर्णय घ्यावा, पण अंमलबजावणीत कुचराई करु नये.”

थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर आहे. पोलीस आणि प्रशासनाने गर्दी होणार नाही आणि सूरक्षित अंतर राहील हे पाहिलंच पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

“मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा”

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाऊन करणे सोपे होते पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात, पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे.”

“रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको”

उद्धव ठाकरे म्हणाले, “ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले. मात्र याठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे. घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे, पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल.”

“नॉन कोव्हिड रुग्णास दुर्लक्षित करू नका”

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टरांना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करुन घ्या.”

“रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी”

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले, “शहरी भागात असलेला कोरोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणे महत्वाचे आहे. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी कोरोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे. तसेच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे.आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाईल. यात कुठेही चूक होता कामा नये. कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यायचे आहे. हे क्षेत्र जितके लहान ठेवता येईल तितके ठेवा. तसेच क्षेत्राच्या सीमा पूर्णत: बंद असतील, तसेच क्षेत्राच्या आतमध्ये देखील वेळच्यावेळी तपासण्या, सुरक्षित अंतर, फवारणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील व तेथील लोक हे पाळतील हे पाहावे.”

प्रधान सचिव भूषण गगराणी म्हणाले, “कोविड योद्धा म्हणून सहभागी झालेल्यांचे प्रशिक्षण 2-3 दिवसांमध्ये संपेल आणि मग हे सर्व त्या त्या जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी जाऊ शकतील. प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन गिर्यारोहक महासंघाचे कार्यकर्ते देखील नगर, ठाणे, सांगली इथे प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत.”

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या

प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांची माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या 31 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच देशातील एकूण मृत्यूच्या 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी 19 टक्के इतकी आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 9.3 दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11.3 दिवस इतका आहे. मृत्यू दर देशात 3.23 टक्के आहे, तर महाराष्ट्रात तो 4.22 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष 1225 चाचण्या होतात. चाचण्यांचं हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी आहे आणि मृत्यूदर जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घेत हे रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी प्रधान सचिव राजीव मित्तल आणि डॉ नितीन करीर यांनी देखील परप्रांतीय मजुरांना कशा पद्धतीने पाठवत आहोत याची माहिती दिली.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Live Update : नवी मुंबईत दिवसभरात 34 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 348 वर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच, भवानी पेठेत 39 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

Lockdown : लॉकडाऊन असूनही ‘कोरोना’ का पसरतोय?

रखडलेल्या मेगाभरतीला पुन्हा स्थगिती, कोरोनामुळे 70 हजार जागांची भरती पुन्हा रखडली

संबंधित बातम्या  :


CM Uddhav Thackeray on making maharashtra green zone