तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता? राहुल गांधी म्हणतात…

| Updated on: May 16, 2020 | 2:02 PM

"रस्त्यांवर चालणाऱ्या प्रवासी मजुरांना कर्जाची नाही तर पैशांची आवश्यकता आहे", असं राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) म्हणाले.

तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता? राहुल गांधी म्हणतात...
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या कामांवर टीका केली. यावेळी त्यांना तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकारला काही सूचना दिल्या (Congress MP Rahul Gandhi) .

“मी पंतप्रधान नाही. मात्र विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून सांगू इच्छितो की, एक व्यक्ती आपलं घरदार, गाव आणि राज्य सोडून पोटापाण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातो. त्यामुळे सरकारला आता रोजगारासाठी एक राष्ट्रीय रणनीती आखावी लागेल”, असं राहुल गांधी यांनी उत्तर दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे रुतलेल्या अर्थचक्राला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. यामध्ये स्थलांतरित मजूर आणि शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकरी आणि मजुरांना कर्ज घेता येणार आहे. मात्र, याच गोष्टीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

“रस्त्यांवर चालणाऱ्या प्रवासी मजुरांना कर्जाची नाही तर पैशांची आवश्यकता आहे. लहान मुलगा रडतो तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही. मुलाचं रडणं कसं बंद होईल यासाठी खटाटोप करते. सरकारने देशातील नागरिकांना सध्या सावकारासारखी नाही तर आईसारखी वागणूक द्यायला हवी”, असं राहुल गांधी म्हणाले.

“सर्वसामान्य, गरिब, होतकरु मजुरांसाठी सरकार, विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी मिळून काम करायला हवं. लॉकडाऊनची झळ बसलेल्या देशातीव सर्व गरिबांच्या बँक खात्यात तातडीने पैसे भरायला हवेत”, असा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला.

“भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका. ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. ते सध्या संकटात आहेत. त्यांना आधार द्या. रेटिंग आपोआप सुधारेल”, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

“लॉकडाऊन हा आपल्या सर्व समस्यांवरील उपाय नाही. त्यामुळे आपल्याला हळूहळू लॉकडाऊन उठवावा लागेल. आपल्याला लहान मुलं, वृद्ध यांचा विचार करुन हळूहळू लॉकडाऊन उठवावा लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातमी :

प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, अभिजीत बिचुकलेचं पंतप्रधान मोदींना पत्र