ज्वारीच्या कणसांना कोंब, सोयाबीन मातीमोल, गंगाखेडच्या शेतकऱ्यांची सरसकट भरपाईची मागणी

| Updated on: Nov 02, 2019 | 1:34 PM

पिंपळदरी (Gangakhed Farmers ) परिसरात तर ज्वारीची कणसांना पुन्हा कोंब फुटलेत. फुटलेला कापूस पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे कापूस उत्पादकांचंही मोठं नुकसान झालंय.

ज्वारीच्या कणसांना कोंब, सोयाबीन मातीमोल, गंगाखेडच्या शेतकऱ्यांची सरसकट भरपाईची मागणी
Follow us on

परभणी : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं चांगलंच झोडपलंय. गंगाखेड तालुक्यातील (Gangakhed Farmers) पिंपळदरी, बोर्डा, सुप्पा, खोकलेवाडी, चिलगरवाडी ह्या भागात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडलाय. त्यामुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय. पिंपळदरी (Gangakhed Farmers ) परिसरात तर ज्वारीची कणसांना पुन्हा कोंब फुटलेत. फुटलेला कापूस पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे कापूस उत्पादकांचंही मोठं नुकसान झालंय. कित्येक एकरावरचं सोयाबीन पावसाच्या पाण्यात मातीमोल झालं आहे.

तहसिलदारांची पाहणी      

गंगाखेडचे तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी काल पथकासह पिंपळदरी परिसराची पहाणी केली. शेतकऱ्यांच्या सर्व नुकसानीचे पंचनामे केले जातील असं आश्वासन यावेळेस गावकऱ्यांना तहसिलदारांनी दिले. दुसरीकडे शेतकऱ्यांनी अगोदरच पीक विमा उतरवलेला आहे. त्यासाठी नुकसानीचे अर्ज वैयक्तिकरित्या शेतकरी भरतायत आणि विमा कंपन्यांना सादर करतायत. पण ओला दुष्काळाचं संकट एवढं मोठं आहे की पिकविमा सरसकट मिळावा अशी मागणी परिसरातल्या शेतकऱ्यांनी केलीय. ह्यावेळेस पिंपळदरी सर्कलचे जि.प.सदस्य, परिसरातल्या गावातले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे सगळे हजर होते.

ढगांचा मुक्काम, थंडी गायब

परभणी-लातूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर पिंपळदरीचा परिसर येतो. हा डोंगरदऱ्यांचा भाग असून महादेवाच्या डोंगररागांमध्ये येतो. दिवाळीपर्यंत ह्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होत असते. पण ऑक्टोबर उलटून नोव्हेंबर सुरु झाला तरीही परिसरातून थंडी गायब आहे. तर वातावरण ढगाळ असून दुपारनंतर काळ्याकुट्ट ढगांचा मुक्काम वाढतो आणि दुपारनंतर रोज धो धो पाऊस पडतो. याच पडणाऱ्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतं पाण्याखाली असल्यामुळे शेतीची कुठलीच कामंही करता येत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

पाण्याचा प्रश्न मिटला

परतीच्या पावसानं मुक्काम लांबल्यामुळे गंगाखेड तालुक्यातल्या दक्षिण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. इसाद, पिंपळदरी, वागदरी, तांदळवाडी, कोद्री, बडवणी ह्या परिसरातली लहान मोठे असे तळे, बंधारे, ओव्हरफ्लो झालेले आहेत. या दिवसात दरवर्षी नद्या- ओढे कोरड्या पडत चाललेल्या असतात तर अजूनही नद्या तुडूंब वाहत आहेत. सुरुवातीच्या काळात पाऊस लवकर पडला नाही पण जाता जाता त्यानं मुक्काम लांबवल्यानं परिसर अजूनही हिरवागार आहे. ह्याच भागात सीताफळाचं पीकही मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ढगांमुळे त्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे. जसा पाऊस लांबला तसा हिवाळाही लांबणार का आणि मग उन्हाळाही जून महिन्यापर्यंत जाणवणार का अशी साशंकताही शेतकऱ्यांच्या मनात डोकावतेय.