Exclusive : मराठा समाजाच्या आग्रहामुळे फडणवीस सरकारने युक्तिवादापासून रोखले, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणींचा गौप्यस्फोट

| Updated on: Sep 13, 2020 | 6:11 PM

वकिलांवर आरोप करुन काहीही साध्य होणार नाही, असे आरोप केल्यास याचा विपरीत परिणाम होतील" असे म्हणत कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होण्याचा धोका आशुतोष कुंभकोणी यांनी बोलून दाखवला.

Exclusive : मराठा समाजाच्या आग्रहामुळे फडणवीस सरकारने युक्तिवादापासून रोखले, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणींचा गौप्यस्फोट
Follow us on

मुंबई : “मी कोर्टात बाजू मांडू नये, यासाठी मराठा समाजाने तत्कालीन (फडणवीस) सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीला मान देऊन मी मराठा आरक्षणाच्या सुनावणीपासून दूर राहिलो” असा गौप्यस्फोट महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना केला. समाजाला अजूनही असंच वाटत असेल, तर मी यापासून संपूर्णपणे अलिप्त राहीन, अशी तयारीही कुंभकोणी यांनी दर्शवली. (Devendra Fadnavis government had asked me not to appear in Maratha reservation case, says Maharashtra AG Ashutosh Kumbhakoni)

“कोणत्याही वकिलावर अविश्वास दाखवू नका. मराठा आरक्षणाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. आमच्यावर होणारे आरोप पूर्ण चुकीचे आहेत. यापुढच्या कायदेशीर बाबींवरुन लक्ष हटवू नका, आरक्षणाचा संपूर्ण फायदा संबंधितांना मिळाला पाहिजे. वकिलांवर आरोप करुन काहीही साध्य होणार नाही, असे आरोप केल्यास याचा विपरीत परिणाम होतील” असे म्हणत कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होण्याचा धोका आशुतोष कुंभकोणी यांनी बोलून दाखवला.

“मी कोर्टात बाजू मांडू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र तरीही याबाबत मी शक्य ती सगळी मेहनत घेतली. त्यानंतर सरकारने तुम्ही बाजू मांडू नका अशी विनंती मला केली. त्यामुळे फडणवीस सरकारचा मान राखून मी कोर्टात प्रत्यक्ष बाजू मांडली नाही. समाजाचा आणि तत्कालीन सरकारचा मान राखला” असे आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.

“हायकोर्टात मराठा आरक्षण टिकलं याला सर्वांची मेहनत कारणीभूत आहे. मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न केले आहेत. मी कुठेही यात लक्ष द्यायला कमी पडलो नाही. जर समाजाला अजूनही असं वाटत असेल, तर या प्रकरणापासून मी सर्वार्थानं बाजूला व्हायला तयार आहे.” अशी तयारी कुंभकोणी यांनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना दर्शवली.

“न्यायालयाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही वकिलावर वैयक्तिक टीका करु नका. मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. त्यावरुन लक्ष विचलित करु नका” अशी विनंतीही त्यांनी मराठा समाजाला केली.