Diwali 2020 | दिवाळीच्या सणात ‘नरक चतुर्दशी’चे मोठे महत्त्व, जाणून घ्या मुहूर्ताची वेळ!

| Updated on: Nov 13, 2020 | 6:20 PM

धनतेरसच्या दुसर्‍या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. त्याला ‘नरक चतुर्दशी’ (Narak Charurdashi) असेही म्हणतात.

Diwali 2020 | दिवाळीच्या सणात ‘नरक चतुर्दशी’चे मोठे महत्त्व, जाणून घ्या मुहूर्ताची वेळ!
Follow us on

मुंबई : धनतेरसच्या दुसर्‍या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. त्याला ‘नरक चतुर्दशी’ (Narak Charurdashi) असेही म्हणतात. या दिवशी अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी दिवा लावून यमराजाची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील चतुर्दशी छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी सगळ्याच सणांवर मर्यादा आल्याने दिवाळीचे (Diwali 2020) महत्त्व विशेष आहे. कोरोना महामारी संकटात दिवाळीच्या तेजोमय प्रकाशाने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे (Diwali 2020 Narak Chaturdashi Shubh muhurat).

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवसाची महत्ता अशी आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. राक्षसाचा वध झाल्याने हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अंगणात सूर्योदयापूर्वीच सडा रांगोळी करतात. पहाटे उठून शरीराला तेल लावतात, सुवासिक उटण्याने स्नान करतात. याला अभ्यंग स्नान असे ही म्हणतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमासाठी दीपदान करतात. गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घराच्या पुरुष मंडळींना स्नानाच्या वेळी औक्षण केले जाते. असे म्हणतात की, या दिवशी जो व्यक्ती अभ्यंग स्नान करत नाही त्याला नरकासम त्रास भोगावे लागतात. राक्षसी प्रवृतीचे प्रतिक म्हणून कारीट नावाच्या फळाला पायाने ठेचतात. ज्याप्रमाणे भगवंताने नरकासुराचा वध केला, त्याप्रमाणे आपणही आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींना दूर करावे, अशी या मागची संकल्पना आहे (Diwali 2020 Narak Chaturdashi Shubh muhurat).

यंदाचे शुभ मुहूर्त

चतुर्दशी तिथी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 नोव्हेंबर रोजी 2 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजून 23 मिनिट ते 6 वाजून 43 मिनिटांपर्यंत नरक चतुर्दशीची पूजा करण्याचा शुभ काळ आहे. या 1 तास 20 मिनिटात आपण नरक चतुर्दशीची पूजा करू शकता.

(Diwali 2020 Narak Chaturdashi Shubh muhurat)

नरक चतुर्दशीची आख्यायिका

रती देव नावाचे एक राजा होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणतेही पाप केले नव्हते. एके दिवशी त्यांच्यासमोर एकाएकी यमदूत येऊन उभे राहिले. यमदूताला असे आपल्या समोर बघून ते आश्चर्यचकित होऊन यमदूताला म्हणाले की, ‘मी तर आपल्या जीवनात कोणतेही पाप केलेले नाही. तरी ही मला नरकात जावे लागणार का?’. त्याचे हे बोलणे ऐकून यमदूत म्हणाला की, ‘राजन एकदा आपल्या दारातून एका ब्राह्मणाला उपाशी पोटी परतावे लागले होते. हे त्याच पापाचे परिणाम आहे.’

यमदूताचे हे बोलणे ऐकून राजाने प्रायश्चित करण्यासाठी एका वर्षाचा वेळ मागितला. यमदूतांनी राजाला एका वर्षाचा वेळ दिला. यादरम्यान राजा ऋषींकडे पोहोचले आणि त्यांना आपली सर्व कहाणी सांगून, त्यातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की, ‘आश्विन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीचा उपास करावा आणि ब्राह्मणाला जेवू घालावे’. राजाने ऋषींच्या सांगण्यानुसार केले आणि पापातून स्वतःला मुक्त केले. यानंतर राजाला विष्णू लोकात स्थान मिळाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्ती मिळविण्यासाठी आश्विन चतुर्दशीच्या दिवशी उपवास आणि दिवा लावण्याची प्रथा सुरू झाली, अशी नरक चतुर्दशीची आख्यायिका प्रचलित आहे.

(Diwali 2020 Narak Chaturdashi Shubh muhurat)