उस्मानाबाद : राज्यभरात ओला दुष्काळाची (Drough in two talukas) मागणी होत असताना, राज्य सरकारने आता कुठे उन्हाळ्यात चटके सोसलेल्या तालुक्यात दुष्काळ (Drough in two talukas) जाहीर केला आहे. परतीच्या पावसाने रब्बी हंगामाची वाट लावली आहे. मात्र सरकारने आता खरीप 2019 च्या हंगामात राज्यातील केवळ 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात गंभीर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने लेखी आदेश काढत दुष्काळी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्काळ जाहीर केल्यामुळे या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट, शेतीशी निगडीत कर्जवसुलीस स्थगिती, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीचे शैक्षणिक शुल्क माफ , रोहयोच्या कामात काही निकषात शिथिलता देऊन कामे सुरू, गरजेनुसार टँकर, शेतीच्या पंपाची वीज खंडीत न करणे, पीक कर्ज पुनर्गठनसह अन्य उपाययोजना आणि सवलती सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांत मध्यान्ह भोजन योजना सुद्धा दीर्घ मुदतीसाठी राबविण्यात येणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान देण्यात येणार असून हा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमानाची तूट, उपलब्ध भूजल कमतरता, पेरणी खालील क्षेत्र आणि पीक स्तिथीचा विचार करुन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात एकीकडे सर्वत्र दुष्काळाची गंभीर स्थिती असताना केवळ 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाचे संकट असतानाच परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूससह अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे.