दहावीच्या पेपरफुटीचं गौडबंगाल, मराठीची प्रश्नपत्रिका फुटल्याचं वृत्त शिक्षणमंत्र्यांनी फेटाळलं

| Updated on: Mar 04, 2020 | 8:01 AM

जळगावातील परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला. Education Minister denies SSC Paper Leak

दहावीच्या पेपरफुटीचं गौडबंगाल, मराठीची प्रश्नपत्रिका फुटल्याचं वृत्त शिक्षणमंत्र्यांनी फेटाळलं
Follow us on

मुंबई : जळगावात एसएससी बोर्डाची इयत्ता दहावीच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचं वृत्त शालेय शिक्षण मंत्र्यांनी फेटाळलं. दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे पेपरफुटीचं नेमकं काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Education Minister denies SSC Paper Leak)

‘दहावीच्या परीक्षा केंद्र क्रमांक 3351 म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील काकोड्यामधील कुऱ्हा येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. याविषयी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करुन अहवाल सादर केला आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे आहे, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला.

SSC paper leak | दहावीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला

मराठीचा पेपर सुरु होताच अगदी पंधरा मिनिटात ‘व्हॉट्सअॅप’वरुन प्रश्नपत्रिका कॉपीबहाद्दरांच्या हाती सापडली होती. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ‘टीव्ही9’ने समोर आणला होता. त्यानंतर शिक्षण विभागाच्या उलट्या बोंबा पाहायला मिळत आहेत. प्रसारमाध्यमांनाच चौकशीसाठी बोलावण्याचा पवित्रा शिक्षण विभागाने घेतला आहे. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ झनके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा! असंही गायकवाड शालेय शिक्षण मंत्री वर्षा यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आवर्जून सांगितलं. परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा पेपरफुटीच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध करु नयेत, असं आवाहनही गायकवाड यांनी केलं.

खरं तर, केंद्रप्रमुख हेतूपुरस्पर पेपरफुटीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांना सुळसुळाट आहे. आपल्या शाळेचा निकाल जास्त लागावा आणि शाळेचे नाव मोठे व्हावे यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचा दावा केला जात आहे.

दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. 23 मार्च 2020 पर्यंत चालणाऱ्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.

Education Minister denies SSC Paper Leak