नवी दिल्ली : आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीनचिट जिली आहे. वर्ध्यातील सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत एक वक्तव्य केलं होतं, ज्याची तक्रार काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा निर्वाळा आयोगाने दिला.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी मोदींची वर्ध्यात सभा झाली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लढत असल्याचा मुद्दा काढला होता. बहुसंख्यांक लोकसंख्येपासून दूर जात राहुल गांधी अल्पसंख्यांक लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत, असं वक्तव्य मोदींनी केल्याची तक्रार काँग्रेसने केली होती.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळमधील वायनाडमधूनही लढत आहेत. अमेठीमध्ये त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याचा टोला लगावत ‘नामदार’ अल्पसंख्यांक असलेल्या मतदारसंघात गेल्याचा टोला मोदींनी लगावला होता. यानंतर 5 एप्रिल रोजी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रार केली.