साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

अहमदनगर : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या दोन्ही निर्णयामुळे संस्थानच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार असल्याचही हावरे यांनी सांगितल. गेल्या पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी तोकड्या पगारावर […]

साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज
Follow us on

अहमदनगर : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या दोन्ही निर्णयामुळे संस्थानच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार असल्याचही हावरे यांनी सांगितल.

गेल्या पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी तोकड्या पगारावर काम करणाऱ्या अडीच हजार कंत्राटी कामगारांच्या लढ्याला अखेर यश आलं. 2018 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना साई संस्थान सेवेत कायम करण्याचा निर्णय संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना संस्थानच्या दोन्ही रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा दिली जाईल.

गंभीर आजारासाठी  इतर दवाखान्यात उपचारासाठी एक लाखापर्यंत उचल दिली जाईल. सोबत मुलांच्या शिक्षणासाठी संस्थानच्या शाळेत शुल्क परतावा देण्याचा आणि महिन्याला चार पगारी सुट्ट्या देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात यापुढे 40 टक्के वाढ होऊन सर्व सुविधा मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

त्याचबरोबर संस्थानच्या कायम सेवेत असणाऱ्या दोन हजार कर्मचाऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या तारखेपासून 7 वा वेतन आयोग सुरु केला जाणार आहे. सरकारच्या मंजूरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. साई संस्थानने सेवानिवृत्ती रकमेतही वाढ केली आहे. पूर्वी 10 लाख रुपये सेवानिवृत्ती रक्कम मिळत होती. ती आता 20 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा 10 लाखापर्यंत अपघात विमाही उतरवला जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेत घेण्यात यावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरु होता. अनेकवेळा याप्रश्नी कर्मचाऱ्यांनी आंदोलनंही केली. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. एकाच वेळी सर्व 2500 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न संस्थानने केला आहे.

कर्मचाऱ्यांनी या निर्णायाचं स्वागत करत अध्यक्ष आणि विश्वस्तांचा सत्कार केला आहे. या निर्णयामुळे 25 कोटीचा नवीन बोजा संस्थानवर पडणार आहे. सध्या संस्थानला कामगार पगारावर वर्षाला 60 कोटी खर्च करावे लागतात. यापुढे यात 25 कोटींची वाढ होऊन हा खर्च 85 कोटींवर जाईल, असे हावरे यांनी सांगितलं.